
पावसाळ्यात वीज पुरवठ्यात बिघाड कमीत कमी व्हावा यासाठी महावितरणतर्फे मोहीम
आगामी पावसाळ्यात ग्राहकांना दर्जेदार, अखंडित आणि सुरळीत वीजपुरवठा मिळावा यासाठी महावितरणकडून रत्नागिरी जिल्ह्यात मान्सूनपूर्व वीज यंत्रणा देखभाल आणि दुरुस्तीची व्यापक कामे पूर्ण करण्यात आली आहेत. मुख्य कार्यालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार वीजपुरवठ्यातील बिघाड कमीतकमी राहावा यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने ही मोहीम राबविण्यात आली.
महावितरणकडून प्राधान्यक्रमानुसार वीज वाहिन्या आणि विविध उपकरणांची तपासणी व दुरुस्ती करण्यात आली. त्यामध्ये उपरी वीजवाहिन्यांना स्पर्श करणार्या झाडांच्या फांद्या छाटणे, तुटलेले पिन आणि डिस्क इन्सुलेटर बदलणे, स्टे वायर आणि स्टे इन्सुलेटरची तपासणी व दुरुस्ती, जळालेले किंवा खराब जंपर बदलणे, गंजलेले अथवा वाकलेले वीज खांब बदलणे तसेच सैल झालेल्या तारांना आवश्यक ताण देणे आदी कामांचा समावेश आहे.
www.konkantoday.com




