
हवामानात मोठा बदल;उन्हाचा ताप कमी होण्याचे संकेत , ३० मे पर्यंत मान्सून तळकोकणात दाखल होणार
मार्च, एप्रिल महिन्यात घाम काढणाऱ्या उन्हाने मे महिन्याच्या सुरुवातीलाही नागरिकांना उकाड्याने हैराण केले असले तरी आता मंगळवारपासून हवामानातील बदलामुळे उन्हाचा ताप कमी होण्याचे संकेत आहेत.मात्र, विदर्भ आठवडाभर उष्णच राहणार असून, उर्वरित राज्याला उन्हापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पूर्वेकडून वाहणाऱ्या उष्ण वाऱ्याचा वेग कमी होईल. तर समुद्राहून जमिनीकडे वाहणारे आता लवकर स्थिर होतील. त्यामुळे वारे तापणार नाहीत.
शिवाय पश्चिमेकडून वाहणारे मान्सूनचे वारेही काही दिवसांत सक्रिय होणार असून, या वाऱ्यामुळे तापमान कमी होण्यास मदत होईल, अशी माहिती हवामान अभ्यासक अथ्रेय शेट्टी यांनी दिली.
विदर्भातील वर्धा व यवतमाळ या दोन जिल्ह्यांना मंगळवारी व बुधवारी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
मध्य महाराष्ट्राचे तापमान ४० हून ३८ खाली येण्याची शक्यता आहे. विदर्भ मात्र तप्त राहील. दरम्यान, मुंबईची आर्द्रता कमी होणार नाही. त्यामुळे मुंबईकरांना उकाडा सहन करावा लागणार आहे.
मान्सून अंदमानात दाखल झाला असून त २६ मेच्या आसपास केरळात दाखल होईल. त्यानंतर ३० मे पर्यंत मान्सून तळकोकणात दाखल होईल, तर जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून मुंबईत दाखल होण्याच्या अंदाज आहे.




