
“भूषण गवईंना हे सांगणारे श्याम मानव कोण?” देवेंद्र फडणवीसांचा सवाल; धीरेंद्र शास्त्री भेटीवरून वाद!
गेल्या दोन दिवसांपासून माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी मध्य प्रदेशातील धीरेंद्र शास्त्री यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतल्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे.
देशाच्या सरन्यायाधीशपदी राहिलेल्या व्यक्तीने अशा प्रकारे धीरेंद्र शास्त्रींच्या पाया पडणं चुकीचं असल्याच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या. यावर अंधश्रद्धा निर्मूल समितीचे संस्थापक अध्यक्ष श्याम मानव यांनी परखड शब्दांत हल्लाबोल केला होता. आता खुद्द राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भूषण गवईंच्या समर्थनार्थ उतरले असून त्यांनी श्याम मानव हे फक्त प्रसिद्धीसाठी अशी विधानं करत आहेत, अशी टीका केली.
काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?
देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना श्याम मानव यांच्या विधानाबाबतच्या प्रश्नावर उत्तर दिलं. भूषण गवईंनी आता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊ नये, असं श्याम मानव म्हणाले होते. त्यावर फडणवीस म्हणाले, ‘श्याम मानव कोण आहेत हे सांगणारे? त्यांना कुणी हा अधिकार दिला? ते थोडीच सर्टिफिकेट वाटणार आहेत? श्याम मानव अलिकडच्या काळात फक्त प्रसिद्धीसाठी बोलतात. त्यांना कुणी विचारत नाहीत, त्यामुळे प्रसिद्धी मिळावी म्हणून ते रोज अशी विधानं करतात’. दरम्यान, आधी बागेश्वर शास्त्री यांनी शिवाजी महाराजांबाबत केलेलं विधान वादात सापडलं असताना आता भूषण गवईंच्या भेटीवरूनही वाद निर्माण झाला आहे.
भूषण गवई व बागेश्वर शास्त्री यांची भेट
भारताच्या सरन्यायाधीशपदावरून निवृत्त झालेले भूषण गवई यांनी नुकतीच बागेश्वरचे पीठाधीश्वर धीरेंद्र शास्त्री यांच्या घेतलेल्या भेटीपासून या वादाला सुरुवात झाली. माजी सरन्यायाधीशांनी बागेश्वर शास्त्रींची भेट घेतल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यावरच श्याम मानव यांनी अमरावतीमध्ये एका कार्यक्रमात परखड शब्दांत टीका केली.




