
ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगाल गमावला! संजय राऊत यांचा राहुल गांधींना सल्ला
उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुक निकालावर भाष्य करणारी एक पोस्ट शेअर केली. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे लक्ष वेधून घेत खासदार संजय राऊत यांनी पश्चिम बंगालमधील निकालाबद्दल काही मुद्दे मांडले आहेत.यात त्यांनी एकूण निवडणूक प्रक्रियेवरच गंभीर शंका उपस्थित केल्या असून, आता ममता बॅनर्जींना साथ द्यायला हवी, असे आवाहन केले आहे.
खासदार संजय राऊत म्हणाले, “पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचा पराभव भाजपाने केला नाही, तर निवडणूक आयोग, केंद्रीय सुरक्षा दले आणि सुमारे तीस लाख मतदारांना मताधिकार नाकारण्याने केला आहे.”
महाराष्ट्राचा उल्लेख करत राऊत म्हणाले, ‘निवडणूक चोरली’
पश्चिम बंगालच्या निकालाबद्दल बोलताना संजय राऊत पुढे म्हणाले की, “ही निवडणूक जिंकली गेली नाही, तर चोरली गेली आहे. आपण ममता दीदींबरोबर उभे राहिले पाहिजे. महाराष्ट्रात, बिहारात, हरयाणात, आसामात, ओडिशात अशाच प्रकारे निवडणूक चोरण्यात आली. या अशा विजयाचे ढोल फुटायला हवेत. जागे व्हा”, असे संजय राऊत यांनी ममता बॅनर्जी आणि राहुल गांधींचा उल्लेख करत म्हटले आहेत.




