चार महिन्यांपासून वेतन रखडले; स्वच्छ भारत मिशनचे कर्मचारी आर्थिक संकटात

गुहागर : रत्नागिरी जिल्ह्यात स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांवर सध्या आर्थिक संकटाचे ढग दाटले आहेत. गेल्या चार महिन्यांपासून मानधन न मिळाल्यामुळे सुमारे २५ कंत्राटी कर्मचारी गंभीर अडचणीत सापडले असून त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नियमितपणे काम करूनही मागील चार महिन्यांचे मानधन अद्याप मिळालेले नाही. परिणामी घरखर्च, मुलांचे शिक्षण, वैद्यकीय खर्च यांसारख्या दैनंदिन गरजा भागवणे कठीण झाले आहे. काही कर्मचाऱ्यांवर कर्जाचा बोजा वाढत असून मानसिक ताण देखील जाणवत आहे.
विशेष म्हणजे, स्वच्छता अभियान प्रभावीपणे राबवण्यासाठी हेच कर्मचारी गावागावांत मेहनत घेत असताना त्यांच्याच पोटावर टाच येत असल्याची भावना व्यक्त होत आहे. “आम्ही शासनाच्या योजनांसाठी प्रामाणिकपणे काम करतो, मात्र आमचेच वेतन वेळेवर मिळत नाही, ही अत्यंत खेदजनक बाब आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया कर्मचाऱ्यांनी दिली.
दरम्यान, संबंधित विभागाने याबाबत तातडीने लक्ष घालून प्रलंबित मानधन त्वरित वितरित करावे, अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून जोर धरत आहे. अन्यथा येत्या काळात आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला आहे.
स्वच्छतेच्या लढ्यात अग्रभागी असलेल्या कर्मचाऱ्यांनाच न्याय मिळत नसल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button