
रत्नागिरीतील मच्छिमारांना मोठा दिलासा, ५ सागरी जिल्ह्यांसाठी ६१ कोटी २४ लाखांची तरतूद
रत्नागिरी जिल्ह्यातील मच्छिमारांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. जिल्ह्यातील महत्त्वाच्या मासेमारी बंदरांवर पायाभूत सोयी-सुविधांचा विकास करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. नाबार्डच्या ग्रामीण पायाभूत विकास निधी योजनेतून रत्नागिरीसह राज्यातील पाच सागरी जिल्ह्यांसाठी ६१ कोटी २४ लाख रुपयांच्या विकासकामांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अधिकृत मंजुरी देण्यात आली आहे.
रत्नागिरी जिल्ह्याला लाभलेला विस्तीर्ण समुद्रकिनारा आणि येथी मोठ्या प्रमाणावरील मत्स्यव्यवसाय लक्षात घेता, मासळी उतरविण्याच्या ठिकाणी अद्यावत सुविधांची मोठी गरज होती. अनेक ठिकाणी जेटी, धक्के आणि मासळी साठवणुकीच्या जागांची दुरवस्था झाल्याने मच्छिमारांना मासळी उतरवताना आणि तिची विक्री करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. हीच बाब लक्षात घेऊन नाबार्डच्या कर्ज सहाय्यातून ही कामे पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या विशेष योजनेत ९५ टक्के वाटा नाबार्डचा असून, उर्वरित ५ टक्के वाटा राज्य सरकार उचलणार आहे.
www.konkantoday.com




