
कोकण कृषी विद्यापीठाला भारतीय कृषी अनुसंधान परिषदेकडून अ दर्जा प्राप्त
दापोली : येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाला भारतीय कृषी अनुसंधान परिषद आयसीएआर कडून मानांकन प्रक्रियेत “अ” दर्जा प्राप्त झाला आहे. हे मानांकर २०२५ ते २०२९ या पाच वर्ष कालावधीसाठी देण्यात आले आहे. या यशामुळे शैक्षणिक, संशोधन व विस्तार कार्याची गुणवत्ता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
आयसीएआर च्या मानांकर प्रक्रियेदरम्यान अध्यापन पद्धती, संशोधनातील गुणवत्ता, आधुनिक सुविधा तसेच शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणारे विस्तार कार्य या सर्व बाबींचा बारकाईने आढावा घेण्यात आला. या सर्व निकषांमध्ये विद्यापीठाने उल्लेखनीय कामगिरी करत “ए” ग्रेड पटकावली आहे.
विद्यापीठाने गेल्या काही वर्षांत कोकणातील शेतीला पूरक संशोधन, स्थानिक पिकांच्या विकासासाठी केलेले प्रयत्न आणि शेतकऱ्यांशी सातत्याने ठेवलेला संवाद यामुळे हे यश शक्य झाल्याचे सांगितले जात आहे. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यात विद्यापीठ आघाडीवर राहिले आहे.
या मानांकनामुळे विद्यापीठाची राष्ट्रीय स्तरावरील ओळख अधिक भक्कम झाली असून भविष्यात संशोधन व शिक्षण क्षेत्रात नव्या संधी उपलब्ध होणार आहे. कुलगुरू डॉ. संजय भावे यांच्या कुशल नेतृत्वाखाली विद्यापीठातील प्राध्यापक, संशोधक, अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या एकत्रित प्रयत्नांचे हे फलित असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. या उल्लेखनीय यशाबद्दल विविध स्तरातून विद्यापीठावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



