
मुंबई-गोवा महामार्गाचे काम मे अखेर पूर्ण होणार; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ग्वाही!_____
अनेक वर्षांपासून रखडलेल्या आणि कोकणवासीयांसाठी कळीचा मुद्दा ठरलेल्या मुंबई-गोवा महामार्गाबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मोठी आणि दिलासादायक घोषणा केली आहे. मे महिना संपण्यापूर्वी या महामार्गाचे काम पूर्ण करण्यात येईल, अशी ठाम ग्वाही त्यांनी दिली आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात गडकरी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते.
’राजकारणात खोटं बोलत नाही’
आपल्या खास शैलीत बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, “या रस्त्याबाबत अनेकांनी मला प्रश्न विचारले आहेत. राणे साहेब शब्दाचे पक्के आहेत, त्यामुळे त्यांच्या उपस्थितीत मी स्पष्ट सांगतो की, राजकारणात मी खोटं बोलत नाही. यंदाच्या पावसाळ्यापूर्वी हा मार्ग पूर्णत्वास जाईल आणि प्रवाशांना होणारा मनस्ताप थांबेल.” या महामार्गाच्या अपूर्ण कामामुळे झालेली बदनामी मान्य करत, काम पूर्ण झाल्यावर आपण स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मुंबई ते गोवा असा रस्त्याने प्रवास करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कोल्हापूर-रत्नागिरी मार्गही लवकरच
यावेळी गडकरी यांनी कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गाबाबतही महत्त्वाची माहिती दिली. या मार्गाचे ९० टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित काम आणि बोगद्याचे काम मे महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण करून हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले.
गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे, वाहतूक कोंडी आणि रखडलेले काम यामुळे नागरिक प्रचंड त्रस्त होते. प्रवाशांचा वेळ आणि इंधन वाया जात होते. आता गडकरींच्या या घोषणेमुळे महामार्ग पूर्ण होण्याची आशा पल्लवित झाली असून, यामुळे कोकणातील पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, उद्योगमंत्री उदय सामंत, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री आशिष शेलार, आमदार निलेश राणे, आमदार दीपक केसरकर व आमदार प्रसाद लाड आदी मान्यवर उपस्थित होते.




