
कर्जफेड नियमित वेळेत करण्यासाठी सहकार्य करा- युगंधरा राजेशिर्के
रत्नागिरी जिल्हा महिला पतसंस्थेची वार्षिक सभा
रत्नागिरी, : गेली ३५ वर्षांत रत्नागिरी जिल्हा महिला पतसंस्थेची दमदार व यशस्वी वाटचाल चालू आहे. कर्जदार, ठेवीदार व कर्मचाऱ्यांच्या सहकार्यातून संस्था काम करत आहे. कोणत्याही कारणासाठी कर्ज घेतले जाते. सहकारातले नियम बदलत आहेत. त्यामुळे कर्ज फेड योग्य रितीने व्हायला हवी तसेच कर्जदार व जामीनदार यांनी कर्ज फेड वेळेत कशी होईल, याकडे लक्ष दिले पाहिजे. सहकार चळवळ वाढवत संस्थेला अजून मोठी झेप घ्यायची आहे, असे प्रतिपादन जिल्हा महिला पतसंस्थेच्या अध्यक्ष सौ. युगंधरा राजेशिर्के यांनी केले.
पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत त्या बोलत होत्या. या वेळी मंचावर उपाध्यक्षा सुजाता तांबे, संचालिका स्वप्ना सावंत, जानकी बेलोसे, प्राची शिंदे, भाग्यश्री निंबाळकर, सल्लागार मीना रेडीज, मुख्य कार्यकारी अधिकारी कृतिका सुवरे, व्यवस्थापिका सौ. आदिती पेजे उपस्थित होत्या. सभेला बहुसंख्य सभासद महिला उपस्थित होत्या.
गेल्या ३५ वर्षांत अनेक अडचणी आल्या. काही वेळा कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागला. पण प्रामाणिक व पारदर्शक व सचोटीने काम केल्यामुळे संस्थेला यश मिळाले आहे. संस्था टिकवण्यासाठी आम्ही आतापर्यंत कधीही भ्रष्टाचाराला थारा नाही, संचालक मंडळ उधळपट्टी करत नाही. निस्वार्थी समाजकार्याची आवड असणाऱ्या संचालक मंडळ आहे. वेळ देऊन, त्याग करून सर्व संचालिकांचे खूप सहकार्य मिळत आहे. त्यामुळे इतकी वर्षे संस्था यशस्वीपणे कार्यरत आहे, असे युगंधरा राजेशिर्के यांनी आवर्जून सांगितले.
या सभेत वर्षभरात चांगले काम केल्याबद्दल खेड येथील शाखाधिकारी शुभदा गोगावले यांचा व लांजा शाखेला उत्कृष्ट शाखा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या महिला कर्जदारांचा सन्मान करण्यात आला. कर्मचाऱ्यांच्या मुलांचा या वेळी उल्लेखनीय यशाबद्दल भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये साहील गोगावले, सिया वारे, ऋतुजा पुरात, ऋषभ कोतवडेकर, शार्दुल पेजे, शर्वरी आडविलकर यांचा समावेश होता. तसेच संस्थेतून निवृत्त झालेल्या संजीवनी गांधी, पिग्मी प्रतिनिधी नेत्रा सागवेकर, सिद्धी कोतवडेकर, निता धुळप, आवर्त ठेव योजनेसाठी तेजस येद्रे, समिधा कदम, यास्मिन नाखवा यांना गौरवण्यात आले.




