
गुढीपाडव्याच्या दिवशी तब्बल ६७३ वाहनांची नोंदणी
हिंदू नववर्षाची सुरुवात आणि साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या गुढीपाडवाच्या शुभमुहूर्तावर रत्नागिरीत वाहन खरेदीचा उत्साह शिगेला पोहोचला. या एकाच दिवशी तब्बल ६७३ वाहनांची नोंदणी होत उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या तिजोरीत सुमारे अडीच कोटी रुपयांचा महसूल जमा झाला.
पाडव्याच्या दिवशी नवीन बाहन खरेदी करण्याची परंपरा जपत नागरिकांनी शहरातील विविध शोरूम्समध्ये मोठी गर्दी केली होती. आरटीओच्या आकडेवारीनुसार दुचाकींपासून ते अवजड वाहनांपर्यंत सर्व प्रकारच्या गाड्यांची नोंदणी करण्यात आली.
याचबरोबर ’व्हीआयपी’ किंवा आकर्षक नंबर मिळवण्यासाठीही वाहनधारकांनी मोठी उत्सुकता दाखवली. एकूण ८९ जणांनी विशेष पसंतीचे नंबर घेतले असून, त्यातून आरटीओला ९ लाख ३१ हजार रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळाले. वाहन नोंदणी प्रक्रिया सुरळीत पार पडावी आणि नागरिकांना सणाच्या दिवशी कोणताही त्रास होऊ नये यासाठी प्रशासनाने विशेष नियोजन केले होते. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे यांनी सांगितले की, सर्व नोंदणी वेळेत पूर्ण व्हाव्यात यासाठी कर्मचार्यांनी अतिरिक्त मेहनत घेतली. या माध्यमातून शासनाला २ कोटी ३९ लाख ६० हजार ८० रुपयांचा महसूल प्राप्त झाला. गुढीपाडव्याच्या दिवशी सोने-चांदीसोबतच वाहन खरेदीलाही नागरिकांनी मोठी पसंती दिल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत आरटीओ कार्यालयात अधिकारी व कर्मचारी कार्यरत राहिल्यामुळे शेकडो कुटुंबांना पाडव्याच्या शुभदिनी नवीन गाडीची चावी हाती मिळाली.www.konkantoday.com




