
रत्नागिरी – रत्नदुर्ग किल्ला वरील श्री भगवती देवीचा होळी उत्सव २ मार्चला
रत्नागिरी – रत्नदुर्ग किल्ल्यावर विराजमान असलेल्या श्री भगवती देवीचा पारंपरिक होळी उत्सव यंदा २ मार्च रोजी उत्साहात साजरा होणार आहे. देवीची होळी आणण्यासाठी किल्लेकर ग्रामस्थ, देवस्थान ट्रस्टी आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने मांडवी येथे श्री मायनाक यांच्या घरी दुपारी तीन वाजता प्रस्थान करणार आहेत. तेथून होळी तोडून ती रात्री साडेअकरा वाजता रत्नदुर्ग किल्ल्यावर आणण्यात येईल. त्यानंतर विधिवत होम करण्यात येणार आहे.
होळीच्या मार्गावर होळी देण्याच्या सीमेवर यंदा देवस्थान कमिटी तर्फे पाठ ठेवण्यात येणार असून, गावकऱ्यांनी त्या पाठावर होळी ठेवून ती आपल्या ताब्यात घेऊन पुढे नेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. होळी ताब्यात घेणे आणि देणे यावरून निर्माण होणाऱ्या वादांच्या पार्श्वभूमीवर भगवती देवस्थान कमिटीने हा महत्वाचा निर्णय घेतल्याचे अध्यक्ष सुधाकर मोडकर यांनी सांगितले. या निर्णयाची माहिती सर्व गावकऱ्यांना देण्यात आली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, जिल्ह्यात होळीचा उत्सव शांततेत व आनंदाने साजरा करण्याचे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी नागरिकांना केले आहे.




