
जगभरातील मराठी कवींच्या पसंतीस उतरलेल्या ‘गणपत वाणी’समस्यापूर्ती काव्यलेखन स्पर्धेचे दिमाखदार पारितोषिक वितरण


चिपळूण :: महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा चिपळूण आणि कोकण भराठी साहित्य परिषद, शाखा चिपळूण आयोजित आणि ‘आपलं चिपळूण’ सहआयोजक असलेल्या ज्येष्ठ नाटककार अप्पासाहेब जाधव स्मृतीप्रित्यर्थ राज्यस्तरीय समस्यापूर्ती ‘गणपत वाणी’ काव्यलेखन स्पर्धेचे नुकतेच दिमाखदार पारितोषिक वितरण संपन्न झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून एअरमार्शल (निवृत्त) हेमंत भागवत, कंसाई नेरोलॅक पेंट्स लिमिटेडचे जनसंपर्क अधिकारी संतोष देशमुख, उद्योजक प्रशांत पाटेकर, ‘लोटिस्मा’चे अध्यक्ष डॉ. यतिन जाधव, ज्येष्ठ नगरसेवक शशिकांत मोदी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस स्व. अप्पा जाधव यांच्या प्रतिमीचे पूजन-पुष्पहार अर्पण करण्यात आले. प्रमुख पाहुणे हेमंत भागवत यांनी बोलताना, शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयालाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या. ‘गणपत वाणी’ स्पर्धेच्या आयोजकांना त्यांनी कल्पनेसाठी धन्यवाद दिले. यानिमित्ताने चिपळूणचे नाव जगभर पोहोचल्याचे ते म्हणाले. त्यांनी ‘गणपत वाणी’ समस्यापूर्ती काव्यलेखन स्पर्धेसंदर्भात बोलताना वाचनात आलेल्या ‘फ्यूचर टॉक : कॉन्वर्सेशन्स अबाउट टुमारो विद टुडेज़ मोस्ट प्रोवोकेटिव पर्सनैलिटीज़’ या पुस्तकाचा संदर्भ दिला. ‘लोटिस्मा’चे अध्यक्ष डॉ. यतिन जाधव यांनी बोलताना, मराठी भाषेबद्दल असणारे प्रेम आणि इतर देशांतील मराठी भाषिकांनी दिलेला चांगला प्रतिसाद याबद्दल आनंद व्यक्त केला. या अभिवन स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा ‘लोटिस्मा’च्या प्रांगणात झाला याबद्दलही त्यांनी समाधान व्यक्त केले. स्पर्धा आयोजन समितीचे सदस्य आणि ‘मसाप’चिपळूणचे अध्यक्ष प्रा. संतोष गोनबरे यांनी आपल्या प्रास्ताविकातून स्पर्धेमागील भूमिका स्पष्ट केली. जगभरातील साडेपाचशेहून अधिक स्पर्धकांचा मिळालेला प्रतिसाद संस्मरणीय असल्याचे ते म्हणाले. स्पर्धा परीक्षण करताना पारदर्शकपणे उपयोजिलेली कविता कोडिंगची पद्धत, सात दर्दी काव्य परिक्षकांचे सहकार्य, स्पर्धेला विशेष सहकार्य करणाऱ्या मान्यवरांविषयीची कृतज्ञता आदींचे विवेचन त्यांनी केले. ज्यांच्या नावे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले ते स्व. अप्पा जाधव हे रत्नागिरी जिल्ह्याचे लोकप्रिय नाटककार, कवी व लेखक होते. ते एकेकाळच्या सिंधुदूर्ग आणि रत्नागिरी जिल्हा महसूल कर्मचारी संघाचे प्रमुख सल्लागार आणि रत्नागिरी जिल्हा शासकीय सेवानिवृत्त संघाचे माजी अध्यक्ष राहिले होते.

यावेळी विजेता १ – अतुल देशपांडे (नाशिक-ऑस्टिन), विजेता २ – किरण वेताळ (पुणे), विजेता ३ – डॉ. मनोज वराडे (मुंबई), उत्तेजनार्थ १ – विजय सातपुते (पुणे), उत्तेजनार्थ २- विजया गुळवणी (पुणे), उत्तेजनार्थ ३ – वृंदा कुलकर्णी (पालघर), उत्तेजनार्थ ४ – सुधीर नागले (रायगड), उत्तेजनार्थ ५ – हर्षदा सुंठणकर (बेळगाव), प्रोत्साहनपर १ – सुजाता संजय (लंडन), प्रोत्साहनपर २ – डेविड पेनकर (ईस्त्रायल), प्रोत्साहनपर ३ – शर्मिला पटवर्धन (बंगलोर), प्रोत्साहनपर ४ – सुषमा वडाळकर (बडोदे), प्रोत्साहनपर ५ – श्रीती राशिनकर (इंदौर), प्रोत्साहनपर ६ – सारिका बिवलकर (रत्नागिरी), प्रोत्साहनपर ७ – मेधा लोवलेकर (चिपळूण) यातील उपस्थित कवींचा मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम, बांधावरच्या ‘अभिनव’ साहित्य संमेलनाचे प्रतिक असलेली घोंगडी, संमेलन बॅग, स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र, ग्रंथभेट देऊन गौरव करण्यात आला. प्रथम विजेते देशपांडे यांच्या अभिप्रायाचे वाचन प्रा. अंजली बर्वे यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धीरज वाटेकर यांनी केले. ‘गणपत वाणी’ ही कविता बा. सी. मर्ढेकर यांच्या १९५१च्या ‘आणखी कांही कविता’ मधील आहे. मर्ढेकर हे विसाव्या शतकातील कवी केशवसुत यांच्यानंतरचे युगप्रवर्तक कवी होते. युद्धोत्तर काळातील नव्या जाणिवा आणि नव्या युगाची जाणीव व्यक्त करणाऱ्या त्यांच्या कविता राहिल्या. ४७ वर्षांचं (१९०९-१९५६) आयुष्य लाभलेल्या मर्ढेकर यांनी गणपत वाण्याच्या मनात चाललेल्या स्वप्नरंजनात वाचकालाही सहभागी करून घेणाऱ्या अजरामर कवितेसह एकूण १२६ कविता लिहिल्याची माहिती धीरज वाटेकर यांनी सूत्रसंचलनातून दिली. स्वत:च्या श्रेष्ठ वान्द्मयीन दर्जाची जाण असल्यानेच मर्ढेकर यांच्या कवितांना टीपा, तळटीपा, शीर्षक नसल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी ‘लोटिस्मा’चे कार्याध्यक्ष अरुण इंगवले, ‘आपलं चिपळूण’संस्थेचे अध्यक्ष उदय ओतारी, पदाधिकारी आवले, मनोज जाधव, विनायक ओक, प्रकाश घायाळकर, विलास महाडिक, समीर कोवळे, कैसर देसाई, मंदार ओक, प्रा. सोनाली खर्चे, विजय कदम, केदार पाटणकर, रविंद्र गुरव, शिवाजी शिंदे, ईश्वर हलगरे, प्रा. संगीता जोशी आदींसह शहरातील साहित्यप्रेमी मोठ्या संख्यने उपस्थित होते.




