लोकांना हवाहवासा वाटेल, असा कार्यकर्ता पक्षाला हवा

कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना खासदार राणे यांचा संदेश : चिपळूणमध्ये जनता दरबारात १०५ अर्जांचा निपटारा सुरू

चिपळूण : “लोकांना हवाहवासा वाटेल, असा कार्यकर्ता मलाही हवा आहे. नेते प्रश्न सोडवतील, याची वाट बघू नका. तुम्ही लोकांचे प्रश्न स्वतः हाती घ्या आणि ते सोडवा. मी खासदार म्हणून लोकांनी मांडलेले सर्व प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे. परंतु, तुम्ही पक्षासाठी काम करा. आपलं नाव होईल असं कार्य करा. पद मागण्यापेक्षा असं काम करा की पक्षानेच ते पद तुम्हाला द्यावं,” अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे खासदार नारायण राणे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

खा. नारायण राणे यांचा जनता दरबार मंगळवारी चिपळूण येथे पार पडला. शहरातील बहादूरशेख नाका येथील चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या सहकार भवनात झालेल्या या दरबारात वैयक्तिक, सामाजिक, विधायक अशा विविध प्रकारच्या तब्बल १०५ निवेदनांची नोंद झाली. खासदार राणे यांनी सर्व अर्जांची सविस्तर माहिती घेऊन काही प्रश्न तातडीने निकाली काढले, तर काही विषयांचा अभ्यास करून संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून तोडगा काढला जाईल, असा दिलासा दिला.

या वेळी माजी आमदार डॉ. विनय नातू, भाजप नेते प्रशांत यादव, जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, सतीश मोरे, शशिकांत मोदी, चित्रा चव्हाण, स्वप्ना यादव, प्रांताधिकारी आकाश लिगाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश बेले, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योती यादव, मुख्याधिकारी विशाल भोसले, तहसीलदार प्रवीण लोकरे, विभागीय वन अधिकारी गिरिजा देसाई, प्रियांका लगड यांच्यासह विविध खात्यांचे अधिकारी आणि भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

या जनता दरबारात चिपळूण बचाव समितीच्या वतीने रामशेठ रेडीज यांनी गोवळकोट किल्ला ते परशुराम मंदिर असा रोप-वे व्हावा, विमानतळ व्हावे, नद्यांचे रुंदीकरण व्हावे, चिपळूणमध्ये आयटी पार्क स्थापन व्हावे आणि जंगल तोड थांबवावी, अशा मागण्या केल्या. जंगल तोडीबाबत पुरावे द्या, आम्ही तातडीने कारवाई करू, असे राणे यांनी सांगितले. भाजप नेते प्रशांत यादव यांनी वंदे भारत एक्सप्रेसला चिपळूण येथे थांबा द्यावा, खडपोली एमआयडीसीतील पूल दुरुस्त करावा, एमआयडीसी परिसरात ईटीपी प्लांट उभारावा, अशा मागण्या मांडल्या.

पेढे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच प्रवीण पाकळे यांनी चौपदरीकरणात तोडलेल्या पारंपरिक ‘पाखाड्या’ पूर्ववत करण्याची व सवतसडा परिसरात पादचारी पूल उभारण्याची मागणी केली. बळीराम मोरे यांनी कापरे पाझर तलावाबाबत शेतकऱ्यांना मोबदला मिळावा, अशी मागणी केली. नगरसेवक अरुण भोजने यांनी वाशिष्ठी नदीतील गाळ काढण्यासाठी मेरीटाईम बोर्डाची परवानगी मिळावी, तसेच ब्ल्यू आणि रेड लाईनबाबत फेरसर्वे व्हावा, अशी मागणी केली. हे दोन्ही प्रश्न निकाली निघण्याच्या मार्गावर आहेत, असे राणे यांनी सांगितले.

विनोद शिर्के यांनी मालदोली आणि दोणवली या बंदरांचा विकास करण्याची मागणी केली, तर दीप्ती महाडिक यांनी पंधरागाव विभागाला जोडणारा रस्ता आणि पूल दुरुस्त करावा, अशी मागणी केली. नित्यानंद भागवत, अनिल चिले, प्रतीक कांबळे, सुनील तटकरे, विजय चितळे, स्नेहा मेस्त्री, सारिका भावे, अमित शेवडे, विजय साळुंखे, सुप्रिया उतेकर, माधव महाजन, वैशाली निमकर आदींनीही आपल्या मागण्या मांडल्या. प्रियंका कारेकर यांनी आरती निराधार फाउंडेशनला शासकीय मदत मिळावी, अशी मागणी केली.

या दरम्यान माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी राणे यांच्या कामकाजाचे कौतुक केले. प्रत्येक अर्ज हातात घेताच त्यातील प्रश्न आणि विषय त्यांनी ओळखला. जवळपास सर्वच खात्यांचा अभ्यास असल्यामुळे ते प्रश्न तत्काळ सोडवत होते, असे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला माजी उपनगराध्यक्ष व शिंदे गट शिवसेनेचे नेते सुधीर शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष मिलिंद कापडी यांनी हजेरी लावून खासदार राणे यांचे स्वागत केले. शरीफ बिजले यांनी राणे यांच्यासोबत छायाचित्र घेण्याची इच्छा व्यक्त केली, ती राणे यांनी पूर्ण केली.

जनता दरबारात उपस्थित नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी विविध विषय मांडत आपले प्रश्न थेट खासदारांकडे पोहोचवले. राणे यांनी सर्वच प्रश्न गांभीर्याने ऐकून तातडीने निपटारा करण्याचे आश्वासन दिले. आभार प्रशांत यादव यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button