
व्हॉट्सअॅपमुळे एकत्र आले १९९६/९७ च्या पहिल्या बॅचचे माजी विद्यार्थी; शाळेला पाण्याची टाकी व तीन ब्लॅकबोर्डची सप्रेम भेट
नेवरे : न्यू इंग्लिश स्कूल व माँसाहेब मीनाताई ठाकरे ज्युनिअर कॉलेज, नेवरे येथील सन १९९६/९७ च्या पहिल्या बॅचमधील माजी विद्यार्थी व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून अनेक वर्षांनंतर एकत्र आले. आपल्या जडणघडणीत महत्त्वाचे योगदान असलेल्या शाळेसाठी काहीतरी विधायक कार्य करावे, या उदात्त हेतूने या माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेत शाळेला पाण्याची टाकी आणि तीन ब्लॅकबोर्ड सप्रेम भेट दिले.
माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन शाळेचे मुख्याध्यापक मिलिंद महाकाळ सर यांची भेट घेतली. यावेळी शाळेसाठी काहीतरी उपयुक्त मदत करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. त्यावर मुख्याध्यापक महाकाळ सर यांनी शाळेला पाण्याच्या टाकीची तसेच तीन फळ्यांची (ब्लॅकबोर्ड) आवश्यकता असल्याचे सांगितले. ही गरज लक्षात घेऊन माजी विद्यार्थ्यांनी तात्काळ एकत्रित प्रयत्न करून आवश्यक साहित्य शाळेला भेट देण्याचा निर्णय घेतला.
या उपक्रमासाठी अनेक माजी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे आर्थिक व इतर स्वरूपात सहकार्य केले. त्यामध्ये गणेश आरेकर, संदेश मोरे, संदीप पवार, अमर आयरे, मंगेश भारती, प्रीतम सावंत, नूरी तोफा, अनिल चव्हाण, प्रभाकर लोगडे, राकेश गोताड, उज्वला शेट्ये, शैलेश चव्हाण, मनिषा आरेकर, प्रणाली गांगण, स्वाती लिंगायत, राजेश पारकर, विश्वास रहाटे, सतीश थूळ, मीनाज नाकाडे, सुभाष गुरव आणि विजेंद्र पाटणकर यांनी मोलाचे सहकार्य केले.
या सप्रेम भेटीच्या कार्यक्रमावेळी शाळेचे मिलिंद महाकाळ सर, सुभाष बुकशेट्ये सर, शारदकुमार माने सर, ममता सनगरे सर आणि सुखदेव तायडे सर , रावसाहेब भिंगारे यांच्यासह शिक्षकवृंद उपस्थित होता.
तसेच माजी विद्यार्थी इलियाज झारी, भरत रेवाळे, संदीप पवार, समीर नाकाडे आणि नंदकुमार मोरे हे उपस्थित होते.
अनेक वर्षांनंतर व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून पुन्हा एकत्र आलेल्या या पहिल्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेप्रती असलेली कृतज्ञता प्रत्यक्ष कृतीतून व्यक्त केली. “ज्या शाळेने आपल्याला घडविले, त्या शाळेसाठी आपणही काहीतरी योगदान दिले पाहिजे,” या भावनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
या उपक्रमामुळे माजी विद्यार्थी आणि शाळेतील नाते अधिक दृढ झाले असून, भविष्यातही शाळेच्या विकासासाठी विविध उपक्रम राबविण्याचा माजी विद्यार्थ्यांचा मानस आहे.



