
पाकिस्तानचा पराभव करत भारतीय महिला क्रिकेट संघाने आशिया कपच्या उपांत्य फेरीत मारली धडक
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात दणदणीत विजय मिळवत भारतीय महिला क्रिकेट संघाने आशिया कपच्या उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे. भारताने साखळी फेरीत अत्यंत दमदार कामगिरी करत आपले हे स्थान पक्के केले असून, आता भारतीय संघाचा पुढील सामना कधी आणि कोणाविरुद्ध होणार याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.
या सामन्यात भारताने भेदक गोलंदाजी करत पाकिस्तानला अवघ्या ५५ धावांवर गुंडाळले. भारताकडून श्री चरणी आणि प्रेमा रावत यांनी प्रत्येकी ३, तर दीप्ती शर्माने २ बळी टिपले. या सोप्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने ८.४ षटकांत ३ गडी गमावून सहज विजय निश्चित केला. फलंदाजीत कर्णधार हरमनप्रीत कौरने नाबाद १८ धावा, तर शफाली वर्माने १२ धावांची खेळी केली.
भारताचा हा ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक चेंडू राखून मिळवलेला चौथा मोठा विजय ठरला आहे. भारतीय संघाने ६८ चेंडू राखून हा सामना जिंकत २०१९ मधील वेस्ट इंडिजविरुद्धचा (५७ चेंडू राखून विजय) विक्रम मोडीत काढला. याआधी २०२२ मध्ये भारताने थायलंडविरुद्ध ८४ चेंडू राखून सर्वात मोठा विजय मिळवला होता, जो आशिया चषक स्पर्धेच्या इतिहासातीलही सर्वात मोठा विजय ठरला होता.




