
रत्नागिरी जिल्ह्यात हत्तीरोगाचे ८३ पॉझिटीव्ह रूग्ण मिळाल्याने जिल्ह्यात चिंतेचे वातावरण
’माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियानांतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या विशेष शोध मोहिमेत आतापर्यंत हत्तीरोगाचे ८३ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर ०.८० टक्क नोंदविण्यात आला आहे. हत्तीरोगाचे वेळेत निदान होऊन बाधित रुग्णांवर त्वरित उपचार व्हावेत, यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे दि. १६ ते ३१ ऑगस्ट या कालावधीत ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. संतोष यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात आतापर्यंत १० हजार ४४४ रक्त नमुने संकलित करण्यात आले आहेत. त्यापैकी १० हजार ३७४ नमुन्यांची तपासणी पूर्ण झाली आहे. तपासणीदरम्यान ८३ नमुने पॉझिटिव्ह आढळले आहेत.
तालुकानिहाय आकडेवारीनुसार दापोली तालुक्यात सर्वाधिक २५ रुग्ण आढळले आहेत. त्यापाठोपाठ चिपळूणमध्ये २२, खेडमध्ये १२, रत्नागिरीमध्ये ८, गुहागरमध्ये ६, लांजामध्ये ६ आणि मंडणगडमध्ये ४ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत संगमेश्वर आणि राजापूर तालुक्यात तपासण्यात आलेल्या नमुन्यांमध्ये आतापर्यंत एकही बाधित रुग्ण आढळलेला नाही.




