
पोलिस पाटील संघटनेची बैठक आमदार किरण (भैय्या) सामंत यांच्या उपस्थितीत संपन्न
रत्नागिरी जिल्ह्यातील पोलिस पाटलांवर कोणताही अन्याय होऊ देणार नाही; आमदार किरण सामंत यांची ग्वाही
रत्नागिरी, दि. २४ जुलै : रत्नागिरी जिल्ह्यातील पोलिस पाटलांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत आमदार किरण (भैय्या) सामंत यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात पोलिस पाटील संघटनेची बैठक पार पडली. बैठकीत पोलिस पाटलांच्या विविध मागण्या व अडचणींवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी आमदार किरण सामंत यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “रत्नागिरी जिल्ह्यातील कोणत्याही पोलिस पाटलावर अन्याय होऊ दिला जाणार नाही. त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी शासन व प्रशासन स्तरावर आवश्यक तो पाठपुरावा करून त्या मार्गी लावल्या जातील.”
बैठकीत पोलिस पाटील संघटनेच्या प्रतिनिधींनी मानधन, प्रशासकीय कामकाजातील अडचणी, विविध सुविधा, प्रशिक्षण, शासकीय योजनांचा लाभ तसेच सेवेशी संबंधित इतर प्रश्न मांडले. या सर्व विषयांवर सकारात्मक चर्चा झाली असून अनेक प्रश्नांवर तत्काळ निर्णय घेण्यात आला, तर उर्वरित मागण्यांबाबत संबंधित विभागाकडे आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले.
आमदार सामंत यांनी पोलिस पाटील हे शासन, प्रशासन आणि ग्रामस्थ यांच्यातील महत्त्वाचा दुवा असल्याचे सांगत, कायदा व सुव्यवस्था राखणे, आपत्ती व्यवस्थापन, निवडणूक प्रक्रिया, महसूल आणि विविध शासकीय उपक्रमांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी पोलिस पाटलांचे योगदान मोलाचे असल्याचे नमूद केले.यावेळी त्यांनी पोलिस पाटील संघटनांना शासन आणि प्रशासनाशी समन्वय ठेवून विकासकामे, लोककल्याणकारी योजना आणि सामाजिक उपक्रम यामध्ये सक्रिय सहकार्य करण्याचे आवाहन केले. प्रशासन आणि पोलिस पाटील यांच्यात सुसंवाद व समन्वय राहिल्यास सर्वसामान्य नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
बैठकीत उपस्थित पोलिस पाटील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार किरण सामंत यांनी दिलेल्या आश्वासनाचे स्वागत करत, प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी घेतलेल्या सकारात्मक भूमिकेबद्दल त्यांचे आभार मानले.



