
कोकणातील आंबा बागायतदारांना फळपीक विम्यामध्ये भरघोस सूट, पालकमंत्री उदय सामंत
सन २०२६-२७ च्या आंबा हंगामासाठी फळपीक विमा योजनेच्या निकषांमध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. आंबा पिकासाठी शेतकर्यांना विमा हप्ता प्रति हेक्टर १३ हजार ६०० रुपये वरून ८ हजार ५०० रुपये इतका करण्यात आला आहे. प्रत्येक हेक्टरमागे ५ हजार १०० रुपयांची घसघशीत सूट मिळणार आहे. तसेच विमा संरक्षणाचा कालावधी १५ मे ऐवजी ३१ मेपर्यंत वाढविण्यात आल्याने उशिरा होणार्या प्रतिकूल हवामानापासूनही संरक्षण मिळणार असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.
शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत सामंत बोलत होते. सामंत यांनी सांगितले की रत्नागिरीच्या शेतकर्यांना शासनाच्या मोठ्या घोषणा फळपीक विम्यात मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील आंबा, काजू, नारळ, सुपारी तसेच भात व नाचणी उत्पादक शेतकर्यांसाठी राज्य शासनाने विविध महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. फळपीक विमा योजनेतील सुधारणा, मागेल त्याला काजू योजना, आंबा-काजू नुकसानीसाठी आर्थिक मदत, एआयआधारित उत्पादनवाढ प्रकल्प, काजू बोंडू प्रक्रिया उद्योग आणि मँगो रायपनिंग चेंबर उभारणीसह एकूण आठ महत्त्वाचे निर्णय जाहीर करण्यात आले आहेत.




