
NEET चा गोंधळ संपेना! नागपूरच्या विद्यार्थ्याला थेट अबुधाबीतील केंद्र; NTA च्या कारभारावर प्रश्नचिन्ह!
नागपूर : नीट परीक्षेतील गोंधळ संपता संपेनासा झाला आहे. नागपूरमधील विद्यार्थ्याच्या प्रवेश पत्रावर अबुधाबी परीक्षा केंद्र देण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांची भांबेरी उडाली. देशभरात रविवारी २२ लाख विद्यार्थी नीटची फेर परीक्षा देणार आहे. यापूर्वी पेपरफुटीमुळे घेतलेली परीक्षा रद्द करावी लागली होती. आता नगापूरमधील अब्दुल्ला मोहम्मद या विद्यार्थ्याला परीक्षेसाठी संयुक्त अरब अमिरातमधील अबुधाबी हे परीक्षा केंद्र देण्यात आले. त्यामुळे राष्ट्रीय परीक्षा एजन्सी पालकांचीच परीक्षा घेत निष्काळजीपणाचा कळस गाठत आहे.
उद्या परीक्षा असताना आणि पासपोर्ट नसताना अबुधाबीच्या परीक्षा केंद्रावर कसं जाणार असा प्रश्न पालक आणि विद्यार्थ्याला पडला आहे.
नीट फेरपरीक्षेच्या आदल्या दिवशी नागपूरमधील विद्यार्थ्याच्या हॉल तिकीटवर अबुधाबी केंद्र आल्याने खळबळ
एनटीएचा गलथानपणा थांबेना…
प्रश्नपत्रिका फुटीनंतरही नॅशनल टेस्टिंग एजन्सीचा (NTA) कारभार सुधारला नसल्याचे समोर येत आहे. नीट पेपर लीकवरून वातावरण तापले आहे. पालक, विद्यार्थ्यांनी परीक्षा एजन्सीविरोधात संताप व्यक्त केला. त्यानंतर २१ जून रोजी आता री-नीट परीक्षा होत आहे. पण गोंधळ थांबलेला नाही. एजन्सीने नागपूरमधील अब्दुल्लाह नावाच्या विद्यार्थ्याला २१ जून रोजी होणाऱ्या NEET पुनर्परिक्षेसाठी थेट संयुक्त अरब अमिरात या देशातील अबुधाबी येथील परीक्षा केंद्र दिले आहे. त्यामुळे देशातील विद्यार्थ्याला थेट परदेशातील परीक्षा केंद्र दिल्याने पालक आणि विद्यार्थ्याची भांबेरी उडाली आहे.
माजी शिक्षण मंत्र्यांकडून संताप….
दरम्यान माजी शिक्षण मंत्री डॉ. अनीस अहमद यांनी याबाबत संताप नोंदवला. ते म्हणाले की, नीटसारख्या प्रतिष्ठित परीक्षेची थट्टा सुरू आहे. एनटीएने हे प्रकरण गांभीर्याने घ्यावे आणि नागपूर किंवा जवळच्या शहरात केंद्र देऊन विद्यार्थ्याला सुधारित प्रवेशपत्र जारी करावे.
ही आमच्या सहनशिलतेचीच परीक्षा …
विद्यार्थ्याचे वडील, मोहम्मद तालिब म्हणाले, “अबू धाबी केंद्र पाहून आम्हाला धक्का बसला आहे. आमच्याकडे पासपोर्टही नाही आणि पुरेसा वेळही नाही. त्यामुळे आम्ही मुलाला परीक्षेसाठी परदेशात पाठवू शकत नाही. ही आमच्या सहनशिलतेचीच परीक्षा आहे. या निष्काळजीपणामुळे मुलाची परीक्षा चुकण्याची शक्यता आहे. आम्ही एनटीएच्या हेल्पलाइनवर तक्रार केली आहे. त्यांनी चूक मान्य करत डताळणीनंतर शनिवारपर्यंत नवीन प्रवेशपत्र देण्याचे आश्वासन दिले. मात्र, जोपर्यंत आम्हाला नवीन प्रवेशपत्र मिळत नाही, तोपर्यंत आम्हाला मानसिक तणावाचा सामना करावा लागेल.”




