
कोकणातील प्रसिद्ध लेखक जे. डी. पराडकर यांच्या ’ऋतुरंग’ पुस्तकाला राज्यस्तरीय ’अक्षर गौरव साहित्य’ पुरस्कार जाहीर
’बुक नव्हे तर बुके’ या संकल्पनेतून पुणे येथील प्रसिद्ध चपराक प्रकाशनने कोकणातील लेखक जे. डी. पराडकर यांच्या प्रकाशित केलेल्या ’ऋतुरंग’ या पुस्तकाला सातारा येथील अश्वमेध ग्रंथालय आणि वाचनालयाचा कै. भास्करराव ग. माने स्मृत्यर्थ राज्यस्तरीय ’अक्षर गौरव साहित्य’ विशेष पुरस्कार २०२५ प्राप्त झाला आहे.
’ऋतुरंग’ या पुस्तकाला प्रस्तावना निसर्ग अभ्यासक डॉ. उमेश मुंडल्ये यांनी तर पाठराखण तत्कालीन कारागृह उप महानिरीक्षक स्वाती साठे यांनी केली आहे. ’ऋतुरंग’ या पुस्तकाचे प्रकाशन दिल्ली येथे झालेल्या ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांच्या हस्ते झाले होते. कोणत्याही कार्यक्रमात बुके देणे ऐवजी ’ऋतुरंग’ सारखे कोकणातील फुलांची माहिती असलेले पुस्तक द्यावे. अशी संकल्पना चपराक प्रकाशनचे संपादक घनश्याम पाटील यांनी मांडली होती.
ऋतुरंग या पुस्तकाचे मुखपृष्ठ चित्रकार विष्णू परीट यांनी साकारले आहे. हे पुस्तक संपूर्ण रंगीत पानांचे असून यामध्ये कोकणातील फुलांची छायाचित्र आणि माहिती समाविष्ट करण्यात आली आहे. अश्वमेध ग्रंथालय व वाचनालय साताराचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र माने, संस्थापक रवींद्र भारती यांनी ऋतुरंग या पुस्तकाला राज्यस्तरीय अक्षर गौरव साहित्य विशेष पुरस्कार २०२५ प्राप्त झाल्याबद्दल लेखक जे. डी. पराडकर आणि चपराकचे संपादक घनश्याम पाटील यांचे अभिनंदन केले आहे. हा परस्कार वितरण समारंभ दि. २३ ऑगस्ट रोजी सोमाण सभागृह सातारा येथे सकाळी ११ वा. होणार आहे.



