
कोयना धरणातील पाणीसाठा घटला, चिपळूणकरांवर पाणी कपातीचे संकट
चिपळूण शहरासाठी एक महत्त्वाची आणि चिंतेची बातमी समोर आली आहे. शहराला खेर्डी माळेवाडी आणि गोवळकोट येथील जॅकवेलमधून पाणीपुरवठा केला जातो. मात्र यंदा जून महिन्यात अपेक्षेपेक्षा कमी पाऊस झाल्याने कोयना धरणातील पाणीसाठा चिंताजनकरीत्या घटला आहे. याचा थेट परिणाम वाशिष्ठी नदीच्या प्रवाहावर होत असून भविष्यात चिपळूणकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो.
कोयना धरणातून वीज निर्मितीनंतर वाशिष्ठी नदीपात्रात सोडल्या जाणार्या पाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे नदीतील गोड्या पाण्याचा प्रवाह घटला आहे. परिणामी दाभोळ खाडीतून भरती-ओहोटीच्या काळात खारे आणि मचूळ पाणी गोवळकोट जॅकवेलमार्गे बहादूरशेख परिसरापर्यंत पोहोचत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने तातडीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. भविष्यात शहरात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाला पाणीपुरवठा कपातीसारखे कठोर निर्णय घ्यावे लागू शकतात, अशी माहिती चिपळूण नगर परिषदेकडून देण्यात आली आहे.www.konkantoday.com




