
कोकणात ’मृग’ नक्षत्राच्या सरींनंतर पेरणीला वेग!
कोकणच्या शेतीसाठी अत्यंत शुभ मानल्या जाणार्या मृग नक्षत्राने पाऊस आणल्याने जिल्ह्यात बळीराजाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून पावसाने ओढ दिली असली तरी मृग नक्षत्राच्या पहिल्या सरींनी रत्नागिरीच्या मातीला चिंब भिजवले आहे. पावसाच्या या दणकेबाज हजेरीमुळे जिल्ह्यातील खरीप हंगामाच्या पेरणीला आता प्रत्यक्ष सुरुवात झाली असून, ग्रामीण भागात आता सेतीची लगबग सुरू झाली आहे.
मृग नक्षत्राचा पाऊस म्हणजे पेरणीसाठी दिलेला निसर्गाचा हिरवा कंदील असतो. याच मुहूर्ताची वाट पाहणार्या येथील शेतकर्यांनी आता नांगरणी, मशागतीची कामे पूर्ण करून पेरणीची लगबग सुरू केली आहे. जिल्ह्यात ५६ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे उद्दिष्ट आहे. यात ४७ ते ४८ हजार हेक्टर भात तर ५ हजार हेक्टरवर नाचणीची लागवड होणार आहे. पावसाच्या सरींनी शेतात आता चांगलाच ओलावा तयार झाल्यामुळे बियाणे पेरणीसाठी हे वातावरण अत्यंत अनुकूल ठरत आहे जिल्ह्यातील ५६ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी कृषी विभाग सज्ज झाला आहे. सध्याच्या अनुकूल हवामानामुळे रत्नागिरीच्या शेतात ट्रॅक्टर आणि नांगराचा आवाज घुमू लागला आहे. मृग नक्षत्राच्या कृपेने यंदाचा खरीप हंगाम सुजलाम सुफलाम होईल, अशी आशा शेतकरी वर्गाकडून व्यक्त केली जात आहे.
www.konkantoday.com




