
रत्नागिरी जिल्ह्याच्या सुरक्षेसाठी वर्षाला अडीच कोटींचे डिझेल खर्च
रत्नागिरी जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस वाहनांच्या गस्तीवर दरवर्षी तब्बल अडीच कोटी रुपयांचे डिझेल खर्च होत असल्याची माहिती समोर आली असून याची जिल्हाभर चर्चा सुरू आहे.
सुमारे २३० किलोमीटरची सागरी किनारपट्टी आणि सह्याद्रीच्या दर्याखोर्यांमधील दुर्गम भाग अशा भौगोलिक आव्हानांमुळे रत्नागिरी जिल्हा पोलिसांवर मोठी जबाबदारी आहे. पर्यटनवाढ, सण-उत्सव, व्हीआयपी दौरे तसेच गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांची वाहने दिवस-रात्र रस्त्यावर धावत असतात. रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाकडे सध्या १४० दुचाकी आणि १४२ चारचाकी वाहनांचा ताफा उपलब्ध आहे. या ताफ्यात पिंजरा गाड्या, गुन्हे अन्वेषणासाठी वापरली जाणारी वाहने, वरिष्ठ अधिकार्यांच्या गाड्या तसेच अत्याधुनिक ’डायल ११२२ आपत्कालीन सेवा वाहनांचाही समावेश आहे. पोलीस अधिक्षक, अपर पोलीस अधिक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी आणि विविध पोलीस ठाण्यांतील अधिकारी यांच्या वाहनांचा वापर सातत्याने सुरू असतो.
याशिवाय कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत तातडीने प्रतिसाद देण्यासाठी शीघ्रकृती दल आणि विशेष शाखांनाही स्वतंत्र वाहने देण्यात आली आहेत. रात्रीच्या गस्तीदरम्यान तसेच अपघात, भांडणे, गुन्हे किंवा नागरिकांच्या मदतीसाठी ’डायल ११२’ ची वाहने काही मिनिटांत घटनास्थळी पोहोचतात. या संपूर्ण यंत्रणेच्या सतत सुरू असलेल्या धावपळीमुळे वर्षाकाठी सुमारे २ कोटी ५० लाख रुपयांचे डिझेल खर्च होत आहे.
www.konkantoday.com




