
दरवर्षी याच ठिकाणी याच स्पर्धेचे दिमाखदार आयोजन करू – ना. सामंत
रत्नागिरीत ७२ व्या राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेचा थरार; प्रेक्षकांचा अभूतपूर्व प्रतिसाद
रत्नागिरी
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून रत्नागिरी शहरात ७२ व्या राष्ट्रीय फिटनेस आणि शरीरसौष्ठव स्पर्धा २०२६ चा दिमाखदार शुभारंभ झाला. राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते या स्पर्धेचे भव्य उद्घाटन करण्यात आले. यावेळी आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठवपटू सुहास खामकर यांची प्रमुख उपस्थिती होती. दरवर्षी या स्पर्धेचे अधिक दिमाखदार पद्धतीने आयोजन करू असे ना. उदय सामंत यांनी यावेळी सांगितले.
देशभरातील मातब्बर खेळाडूंची मांदियाळी
या राष्ट्रीय स्पर्धेसाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून शेकडो नामांकित शरीरसौष्ठवपटू रत्नागिरीत दाखल झाले आहेत. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी खेळाडूंच्या पिळदार शरीरयष्टीने आणि आकर्षक ‘पोझेस’नी उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. प्रेक्षकांनी टाळ्या आणि शिट्ट्यांच्या गजरात खेळाडूंना उत्स्फूर्त दाद दिली, ज्यामुळे संपूर्ण रत्नागिरी शहर क्रीडामय झाले आहे.
मान्यवरांच्या उपस्थितीत दिमाखदार सोहळा
कार्यक्रमाच्या सुरुवातीला आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव pattu सुहास खामकर याच्या हस्ते श्रीफळ वाढवून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांचा रत्नागिरी जिल्हा हौशी शरीरसौष्ठव संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बोलताना ना. सामंत म्हणाले, रत्नागिरीच्या क्रीडा क्षेत्रात या स्पर्धेमुळे एक नवा सुवर्ण अध्याय जोडला गेला असून, यामुळे स्थानिक तरुणांना फिटनेस आणि खेळाची मोठी प्रेरणा मिळेल.
उद्घाटन सोहळ्याला उपस्थित मान्यवर
या सोहळ्याला राजकीय आणि क्रीडा क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित होते, ज्यात प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठवपटू (नऊ वेळा भारतश्री, सात वेळा महाराष्ट्र श्री) सुहास खामकर, उपनगराध्यक्ष, रत्नागिरी न.प. समीर तिवरेकर, अध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा हौशी शरीरसौष्ठव संघटना सदानंद जोशी,
कार्याध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा हौशी शरीरसौष्ठव संघटना विरेंद्र वणजू, राष्ट्रीय संघटनेचे पदाधिकारी बी. कृष्णराव, विजय काटदरे, केतकर, बाबू म्हाप, बिपिन बंदरकर, सुदेश मयेकर, नित्यानंद भुते. तसेच जितेंद्र नाचणकर, नगरसेवक राजन शेटे, अमित विलणकर, इम्तियाज काझी, संतोष कदम, संदेश चव्हाण, शैलेश नार्वेकर, फैयाज खतीब, शैलेश जाधव आणि नरेंद्र वणजू यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेसाठी भारतभरातील विविध राज्यांतून अव्वल शरीरसौष्ठवपटू रत्नागिरीत दाखल झाले आहेत. महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर आयोजित या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेमुळे रत्नागिरीच्या पर्यटनालाही चालना मिळेल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.




