
रत्नागिरीसह राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ’जिल्हा तांत्रिक कक्ष’ स्थापन करण्यात येणार
ग्रामीण भागातील घराघरांत नळाद्वारे पाणी पोहोचवल्यानंतर आता त्या योजनांची देखभाल, शुद्धता आणि कार्यक्षम व्यवस्थापन अधिक मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार रत्नागिरीसह राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ’जिल्हा तांत्रिक कक्ष’ स्थापन करण्यात येणार आहे.
आतापर्यंत जल जीवन मिशनअंतर्गत मुख्य भर नळ जोडणी आणि पायाभूत सुविधा उभारण्यावर होता. मात्र, आता पुढील टप्प्यात पाणीपुरवठ्याचे व्यावसायिक व्यवस्थापन, नियमित पुरवठा आणि तांत्रिक देखभाल यावर लक्ष केंद्रीत येणार आहे. करण्यात
रत्नागिरीसारख्या डोंगराळ आणि विखुरलेल्या वस्त्यांच्या भागात तांत्रिक बिघाडामुळे पाणीपुरवठा खंडित होण्याच्या तक्रारी वारंवार येत होत्या. नव्या तांत्रिक कक्षामुळे अशा समस्यांवर प्रभावी तोडगा निघण्याची अपेक्षा आहे.
हा तांत्रिक कक्ष जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन आणि ग्रामपंचायती यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून कार्य करणार आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता यांच्या अध्यक्षतेखाली या कक्षात भूवैज्ञानिक, आरोग्य अधिकारी तसेच अभियांत्रिकी महाविद्यालयातील तज्ज्ञ प्राध्यापकांचा समावेश असणार आहे.
यासोबतच पाणीपुरवठा योजनांचे ऑडिट आता डिजिटल पद्धतीने केले जाणार आहे. ’सुजलम भारत’ डेटाबेसच्या माध्यमातून प्रत्येक योजनेची नोंदणी केली जाईल, तर तक्रार निवारणासाठी ’डिजिटल तिकीट प्रणाली’ लागू केली जाणार आहे. यामुळे दुर्गम भागातील पाणीपुरवठ्यातील अडचणींचे त्वरित निराकरण होईल आणि त्यावर थेट देखरेख ठेवता येईल.www.konkantoday.com




