
युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचे रत्नागिरीमध्ये ढोल ताशांच्या गजरात स्वागत
रत्नागिरी : भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक आज रत्नागिरी शहराच्या दौऱ्यावर आले. त्यांनी रत्नागिरी शहरात राष्ट्रीय स्मारके, मंदिरांना भेट दिली. या दौऱ्यामध्ये सर्वप्रथम स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दौऱ्याची सुरवात केली. त्यानंतर पतीतपावन मंदिर, लोकमान्य टिळक स्मारकास भेट देऊन भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यालय येथे कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्याशी संवाद साधला.
भारतीय जनता पार्टी कार्यालयात महाडिक यांचे आगमन ढोल ताशांच्या गजरामध्ये झाले. महिला मोर्चातर्फे महिलांनी औक्षण करून स्वागत केले. भाजपा शहर सरचिटणीस निलेश आखाडे यांनी कृष्णाराज महाडिक यांची औपचारिक ओळख करून देत कृष्णराज या नावाप्रमाणे आपण आमचे मित्र म्हणून सखा- सोबती म्हणून काम कराल, असा विश्वास व्यक्त केला.
त्यानंतर युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राहुल पवार यांनी युवा मोर्चा अधिक सक्षम कसा होईल याकडे लक्ष देणार असल्याचे सांगितले. भारतीय जनता पार्टी रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीने राजू भाटलेकर यांनी त्यांचे स्वागत केले. युवा मोर्चा वतीने विक्रम जैन यांनी स्वागत केले. रत्नागिरी शहर मंडल म्हणून शहर सरचिटणीस बाबू सुर्वे, सरचिटणीस निलेश आखाडे, उपाध्यक्ष संतोष सावंत, महिला मोर्चा शहराध्यक्ष भक्ती दळी यांनी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
युवा मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष डॉ. ऋषिकेश केळकर यांनी देखील आपले मत व्यक्त करताना युवा मोर्चा सक्षम होण्यासाठी कार्यक्रमाच्या माध्यमातून व शासकीय योजनांच्या माध्यमातून काम करणार असल्याने सांगितले.
महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी आपले मत व्यक्त करताना मी तुमचा मित्र-सखा असून त्या पद्धतीनेच काम करणार आहे. तुम्ही कधीही मला संपर्क करू शकता. युवा मोर्चा जागर यात्रा संपूर्ण महाराष्ट्रात मी फिरत असून भविष्यात मी संपूर्ण महाराष्ट्रभर युवा मोर्चा सक्षम करणार असल्याचे सांगितले. आपल्या मनोगतातून महाडिक यांनी युवा नेतृत्वाला चांगला संदेश दिला.
रत्नागिरीतील युवा उद्योजक, युट्युबर यांच्याशी सकारात्मक चर्चा करत महाडिक यांनी सर्वांचे मन जिंकले. युवा मोर्चा सक्षमीकरणासाठी कृष्णाराज महाडिक यांचा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. कोल्हापूर जिल्हा आणि रत्नागिरी जिल्हा लगतचा जिल्हा असल्याने मी विशेष लक्ष देणार असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.
या कार्यक्रमात जिल्हा उपाध्यक्ष राजू भाटलेकर, युवा मोर्चा प्रदेश पदाधिकारी विक्रम जैन, युवा मोर्चा माजी जिल्हाध्यक्ष डॉ. ऋषिकेश केळकर, बाबा नाचणकर, निलेश आखाडे, भक्ती दळी, बाबू सुर्वे, नगरसेवक राजू तोडणकर, मानसी करमरकर, नितीन जाधव आदी पदाधिकारी कार्यकर्ते नगरसेवक, युवा मोर्चा, महिला मोर्चा पदाधिकारी उपस्थित होते.




