
संगमेश्वर, लांजात अवकाळी पावसाची हजेरी
रत्नागिरी : आज (२६ मार्च) दुपारनंतर अचानक वातावरणात बदल झाला असून, मळभ पसरली होती. त्यानंतर संगमेश्वर, लांजा परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. अचानक झालेल्या या बदलामुळे आंबा पिकावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
आज दुपारनंतर लांजा शहर व परिसरात आज अचानक वातावरणात बदल होत ढगांच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह गारांसह पाऊस सुरू झाला. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता.
संगमेश्वर तालुक्यातील दाभोळे आणि लगतच्या परिसरालाही अवकाळी पावसाचा फटका बसला. दुपारनंतर अचानक काळे ढग दाटून आले आणि पावसाचे आगमन झाले.
सध्या आंबा हंगाम सुरू असून झाडांवर मोठ्या प्रमाणात आंबा तयार होत आहे. अशा वेळी पडणारा अवकाळी पाऊस आंब्याच्या उत्पादनासाठी घातक ठरू शकतो, अशी भीती बागायतदार व्यक्त करत आहेत. आधीच यंदा आंब्याचे पीक कमी असून, आहे त्या ही आंबा पिकाला अवकाळी पावसाचा तडाखा बसतो की काय या चिंतेत बागायतदार आहेत.




