
रत्नागिरी जिल्ह्यात 1 लाख 67 हजार 844 घरगुती तर 109 सार्वजनिक गणेशमूर्तींची होणार प्रतिष्ठापना
रत्नागिरी : यंदा रत्नागिरी जिल्ह्यात 1 लाख 67 हजार 844 घरगुती गणपती तर 109 सार्वजनिक गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना होणार आहे. त्यात 11 हजार 984 दीड दिवसांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. घरच्या गणपती बाप्पासाठी संपूर्ण महाराष्ट्राच्या विविध भागांतून चाकरमानी गावी येतात. या सणामध्ये मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक याठिकाणाहून चाकरमानी मोठ्या संख्येने आपली हजेरी लावतात. सर्वात जास्त घरगुती गणपती हे कोकणामधील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दिसून येतात. अनेक ठिकाणी शक्तीवाले व तुरेवाले डबलबारी तर काही ठिकाणी भजनांचा आवाज ऐकू येतो. अनेक ठिकाणी सार्वजनिक आरत्याही कानावर येतात. अनेक ठिकाणी गणपती सजावट स्पर्धा घेतल्या जातात तर काही ठिकाणी विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यावर्षी संपूर्ण जिल्ह्यामध्ये 54 हजार 506 गौरींची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. दि. 3 सप्टेंबर रोजी त्यांची प्रतिष्ठापना होणार असून 5 सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात विसर्जन होणार आहेत. या वर्षी मोठ्या प्रमाणात नववधू आपले ओवसे साजरे करण्यासाठी येणार असल्याचा अंदाज आहे.