
मिरजोळे गावातील ग्रामस्थांची कुवारबाव पॉवर हाऊस कार्यालयावर धडक
नवीन बसवलेले बीज मीटर बदलल्याशिवाय बिल न भरण्याची ग्रामस्थांची भूमिका
रत्नागिरी : बदलेल्या वीज मीटरनंतर वीजबिले अचानक वाढीव स्वरूपात यायला लागली. यासंदर्भात मिरजोळे ग्रामस्थांनी ग्रामसभेत चर्चा केल्यानंतर प्रत्येकाची रितसर वीज बिल तपासून ग्रामपंचायतीमार्फत कुवारबाव एमएसईबी कार्यालयात संबंधित अधिकाऱ्यांना पत्र देण्यात आली व यावर रीतसर विचार करून वीज बिल कमी करण्यात यावे व जुने परत बसवण्यासाठी सांगण्यात आले; परंतु अधिकाऱ्यांनी याची दखल घेतली नाही. याविरोधात आज (११ सप्टेंबर) संतप्त मिरजोळे ग्रामस्थांनी कुवारबाव पॉवर हाऊस कार्यालयावर धडक देत याबाबत जाब विचारला.
काही महिन्यांपूर्वी मिरजोळे गावातील प्रत्येक घरातील वीज मीटर कोणलाही न विचारता जबरदस्तीने बदलण्यात आले. जुने मीटर व्यवस्थितरित्या चालू असतानाही कोणाला नोटीस न देता किंवा न कळवता बदलण्याची मोहीम एमएसईबीच्या ठेकेदाराकडून राबविण्यात आली. काही लोकांनी त्यावेळी विरोध केला; पण त्यांची मनमानी व धाक देऊन मीटर बदलण्यात आले. या वीज मीटर बदलामुळे सर्व ग्रामस्थांची बिले अचानक वाढीव स्वरूपात यायला लागली. याबद्दल मिरजोळे ग्रामस्थांनी ग्रामसभेमध्ये हा विषय मांडला. व प्रत्येकाची रीतसर वीज बिल तपासून ग्रामपंचायतीमार्फत कुवारबाव एमएसइबी कार्यालयात संबंधित अधिकाऱ्यांना पत्र देण्यात आली व यावर रितसर विचार करून वीज बिल कमी करण्यात यावे व जुने परत बसवण्यासाठी सांगण्यात आले.
परंतु या अधिकाऱ्यांनी याची दखल घेतली नाही. या विरोधात मिरजोळे गावातील ग्रामस्थ आक्रमक झाले. आज (११ सप्टेंबर) दुपारी १२ वाजता सर्व ग्रामस्थ एमएसइबी कार्यालयात धडकले. या वेळी कार्यालयातील अधिकारी देखील उपस्थित होते; परंतु ग्रामस्थांच्या शंकेचे निरसन त्यांना करण्यात आले नाही.
वाढीव वीज बिल आणि स्मार्ट वीज मीटर बदलल्यामुळे ग्रामस्थ खूपच आक्रमक झाले होते. या प्रसंगी सरपंच वैभव पाटील, रत्नदीप पाटील, गजानन गुरव, शुभांनंद पाटील, राहुल पवार, संदेश वाडकर, रजनीकांत पंडये, किशोर जोशी, राजा मयेकर, सुनील कळंबटे, दत्ताराम गुरव आदी ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. तसेच गावातील ग्रामस्थांनीही नवीन वीज मीटर बदलल्याशिवाय कोणीही ग्रामस्थ वीज बिल भरणार नाही अशी ठाम भूमिका घेतली.




