
स्वच्छ बसस्थानक अभियानात रत्नागिरी जिल्हातीलबस स्थानकासह रत्नागिरीचे नवीन बस स्थानक आघाडीवर.
“हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान” अंतर्गत जानेवारी ते मार्च २०२५ या कालावधीत घेण्यात आलेल्या त्रैमासिक सर्वेक्षण अहवालात रत्नागिरी जिल्ह्याने मुंबई प्रदेशात अग्रस्थानी येऊन आपली स्वच्छता आणि व्यवस्थापन क्षमता सिद्ध केली आहे. या अभियानांतर्गत बसस्थानकांची स्वच्छता, प्रशासन व्यवस्थापन आणि हरित उपक्रम अशा विविध निकषांवर आधारित गुणांकन करण्यात आले होते, ज्यात रत्नागिरी जिल्ह्यातील तीन बसस्थानकांनी चमकदार कामगिरी केली आहे.
या सर्वेक्षणानुसार, ‘अ’ वर्गवारीमध्ये रत्नागिरी (नवीन) बसस्थानकाने ८९ गुण मिळवून सर्वाधिक आघाडी घेतली. यात बसस्थानक आणि प्रसाधनगृह यासाठी ३० पैकी २९ गुण, बसस्थानक व्यवस्थापनासाठी ५० पैकी ४४ गुण आणि हरित बसस्थानकासाठी २० पैकी १६ गुण यांचा समावेश आहे. या कामगिरीने रत्नागिरीने पालघर (बोईसर – ८३ गुण) आणि सिंधुदुर्ग (कुडाळ – ७४ गुण) येथील बसस्थानकांना मागे टाकले.त्याचप्रमाणे, ‘ब’ वर्गवारीमध्ये पाली (रत्नागिरी) बसस्थानकाने ८४ गुणांसह उत्कृष्ट कामगिरी केली. या बसस्थानकाला बसस्थानक आणि प्रसाधनगृह यासाठी २८ गुण, बसस्थानक व्यवस्थापनासाठी ४३ गुण आणि हरित बसस्थानकासाठी १३ गुण मिळाले. मुंबईतील दादर एसटी बस स्थानकाच्या (८५ गुण) थोड्या फरकाने पालीने दुसरा क्रमांक पटकावला, तर मुंबईतीलच (८१ गुण) अन्य बसस्थानकाला मागे टाकले.‘क’ वर्गवारीमध्ये देखील माखजन (संगमेश्वर ) बसस्थानकाने ७४ गुण मिळवून जिल्ह्याची शान वाढवली. यात बसस्थानक आणि प्रशासनगृह यासाठी २४ गुण, बसस्थानक व्यवस्थापनासाठी ३७ गुण आणि हरित बसस्थानकासाठी १३ गुण मिळाले. या वर्गवारीतील मुंबई (परळ – ८९ गुण) आणि पालघर (नालासोपारा – ७६ गुण) येथील बसस्थानकांच्या तुलनेत माखजनने तिसरे स्थान पटकावले.
या सर्व्हेक्षणामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील बसस्थानकांच्या उत्तम देखभाल आणि स्वच्छतेसाठी केलेल्या प्रयत्नांना दाद मिळाली आहे. प्रवाशांना स्वच्छ आणि आरोग्यदायी वातावरण पुरवण्यासाठी स्थानिक प्रशासनाचे आणि कर्मचाऱ्यांचे हे प्रयत्न कौतुकास्पद आहेत. या यशामुळे रत्नागिरी जिल्ह्याच्या सार्वजनिक वाहतूक सेवेच्या दर्जात वाढ झाली असून, भविष्यात अन्य बसस्थानकांनाही प्रेरणा मिळेल अशी आशा आहे.