
लाड-पागे समिती ; नगरपरिषद 20 सफाई कामगारांना कायम नियुक्तीपत्र आई वडिलांच्या कष्टामुळे नोकरी याची जाणीव ठेवून काम करा – पालकमंत्री डॉ. उदय सामंत.
रत्नागिरी, दि. 12 : हालअपेष्टा सहन करत आई-वडिलांनी या नगरपालिकेची सेवा केली. सफाई कामगार म्हणून या जनतेची सेवा केली. जनतेला रोगराई होऊ नये, म्हणून रत्नागिरी शहराची स्वच्छता ठेवण्याचे काम त्यांनी केलं. त्यांच्या कष्टामुळे, त्यांच्या पुण्याईमुळे आज नोकरीचे पत्र मिळतंय, याची जाणीव पत्र मिळणाऱ्या प्रत्येक वारसाला असली पाहिजे आणि त्यांचा आदर्श घेऊन भविष्यामध्ये या नगरपालिकेमध्ये आपण सगळ्यांनी मिळून काम करावं, असे आवाहन पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी केले.
रत्नागिरी नगरपरिषदेच्या सभागृहात लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार नगरपरिषदेच्या २० सफाई कामगारांना कायम नियुक्तीपत्र पालकमंत्री डॉ. सामंत यांच्या हस्ते आज वितरण करण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी वैभव गारवे, बंड्या साळवी, राहूल पंडित, बिपीन बंदरकर, विजय खेडेकर, स्मिता पावसकर आदी उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी धोरणात्मक निर्णय घेतला, जो सफाई कामगार म्हणून काम करतो तो कुठल्याही जाती धर्माचा जरी असला, तरी शहर साफ करण्याचं काम करतो. शहराची स्वच्छता ठेवतो. रोगराई होणार नाही याची दक्षता घेतो, अशा सफाई कामगारांच्या मुलांना नोकरी मिळाली पाहिजे. ऐतिहासिक निर्णय त्यांनी घेतला. सरकार म्हणून काम करत असताना फक्त मोठ्या लोकांसाठी काम नाही, तर सर्वसामान्य माणूस शहराची सेवा करतो, जो सफाई कामगार म्हणून काम करतो, त्याला देखील हक्काने नोकरी देण्याचं काम सरकारनं केलं. आधुनिक तंत्रज्ञान वापरून, सफाई कामगारांना बरोबर घेऊन आधुनिक प्रणाली प्रत्येक शहरांमध्ये आणली गेली पाहिजे. आधुनिक प्रणाली वापरुन स्वच्छता करण्याचा मान देखील रत्नागिरी नगरपालिकेने पहिला घ्यावा. शहरांमध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या देखील वाढली आहे. त्यांना चांगल्या सोयी सुविधा दिल्या पाहिजेत. ही जबाबदारी नगरपालिकेची आहे. चांगल्या पद्धतीने घनकचऱ्याचा प्रकल्प भविष्यामध्ये राबवणे गरजेचे आहे. घनकचऱ्याच्या प्रकल्पावर काम करताना आपण आधुनिक पद्धतीने जर कामाची आखणी केली तर रत्नागिरी शहरातील स्वच्छता अतिशय चांगल्या पद्धतीची राहू शकते.
365 दिवस शहर स्वच्छ असले पाहिजे. पर्यटकांमध्ये विलक्षण अशी वाढ झालेली आहे. याचा फायदा देखील रत्नागिरी शहरातल्या लोकांना होत आहे. प्रशासक असताना देखील, मी देखील जनतेचे देणे लागतो, या भावनेतून काम करणारे अधिकारी निर्माण होतात, त्यावेळी खरोखरच शहरातल्या लोकांना दिलासा मिळत असतो. मुख्याधिकारी म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही प्रश्न सोडवले पाहिजेत. शहराला खऱ्या अर्थाने न्याय देण्याची भूमिका आपण घेतोय. मुख्याधिकारी म्हणून आणि नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी देखील अतिशय चांगल्या पद्धतीने शहराचे प्रेझेंटेशन जगासमोर करणं गरजेचं आहे.
लाड पागे समितीच्या शिफारसीप्रमाणे कुटुंबाच्या वारसांना नोकरी देणे हा खंडपीठाचा निर्णय झाल्यानंतर महाराष्ट्रातला पहिला उपक्रम आहे. किती विधायकदृष्ट्या नगरपालिका काम करते आणि भविष्यामध्ये देखील रत्नागिरीच्या उद्धारासाठी काय करणार आहे, हा आदर्श निर्माण करणारा असा कार्यक्रम आहे. कर्मचाऱ्यांना जे पत्र देतोय त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून अभिनंदन करतो. तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो आणि तुमच्या पुढाकारांने रत्नागिरी शहर सर्वांग सुंदर राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो, असेही पालकमंत्री म्हणाले. मुख्याधिकारी श्री. गारवे यांनी आभार मानले.000