एकेकाळी मंत्रिपदाची धुरा असणाऱ्या रवींद्र चव्हाणांच्या हाती आता पक्षसंघटनेची सूत्र


मंगळवारी आमदार रवींद्र चव्हाण यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड केली जाणार आहे. भाजपचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याजागी आता चव्हाणांची वर्णी लागणार आहे. एकेकाळी मंत्रिपदाची धुरा असणाऱ्या रवींद्र चव्हाणांच्या हाती आता पक्षसंघटनेची सूत्र असणार आहेत. येत्या काळात पक्षसंघटनेच्या बळकटीसोबतच युवा कार्यकर्त्यांना घडविण्यासाठी व त्यांना काम करण्यासाठी प्रोत्सहीत करण्याचे नवे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे.दोनच दिवसानंतर रवींद्र चव्हाण भाजप (BJP) पक्षाचा कारभार हाकणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या नव्या मंत्रीमंडळात चव्हाणांना स्थान मिळाले नाही. त्यानंतर त्यांनी नाराजीव्यक्त केली नाही. पक्षाने दिलेल्या आदेशाचे त्यांनी पालन केले. त्यामुळेच पक्षाने मोठी जबाबदारी टाकत त्यांच्यावर मोठा विश्वास दाखवला आहे. पक्षसंघटनेत मोठे पद देताना चव्हाणांची संयमी भूमिका महत्त्वाची ठरली आहे.रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द पहिली तर त्यांनी डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचे सलग चौथ्यांदा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. महायुतीच्या मंत्रिमंडळात त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून काम पाहिले. परंतु यंदा त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. दरम्यान, भाजपचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आता मंत्री पदाची धुरा सोपविण्यात आल्याने रवींद्र चव्हाणांकडे आता प्रदेशाध्यक्षाची धुरा राहणार आहे.महायुतीला विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशानंतर आता कार्यकर्त्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीकडे कार्यकर्त्यांच्या निवडणूका म्हणून पाहिले जाते. त्यामुळे या निवडणुकीत भाजपच्या यशाचा आलेख चढता ठेवण्यासाठी आगामी स्थानिक महापालिका निवडणुकांसाठी त्यांना कंबर कसावी लागणार आहे. याकरिता रणनीती बनवण्यासाठी त्यांची भूमिका महत्वाची असणार आहे. विशेषतः येत्या काळात मित्रपक्ष असलेल्या महायुतीमधील शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत ठेवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button