महाराष्ट्र एकवटणार.! राज ठाकरेंनी मोर्चाची तारीख बदलली; दोन ऐवजी एकच मोर्चा, शिवसेनेला चर्चेसाठी प्रस्ताव


केंद्र सरकारच्या नव्या शैक्षणिक धोरणांतर्गत पहिलीपासून शालेय अभ्यासक्रमात हिंदी भाषेचा सक्तीने समावेश करण्याच्या प्रस्तावाला महाराष्ट्रात तीव्र विरोध होत आहे. या मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी भाषा आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अस्मितेच्या रक्षणासाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे.यापूर्वी 6 जुलै 2025 रोजी नियोजित असलेला त्रिभाषा सूत्राविरोधी मोर्चा आता एक दिवस आधी, म्हणजेच शनिवार, 5 जुलै 2025 रोजी सकाळी 10 वाजता काढण्यात येणार आहे. यासोबतच, दोन स्वतंत्र मोर्चांऐवजी एकच संयुक्त मोर्चा काढण्यासाठी मनसेने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (उबाठा) पक्षाशी चर्चा सुरू केली आहे. राज ठाकरे यांनी सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि मराठी जनतेला या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

मोर्चाची तारीख बदलली

शुक्रवारी सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी मराठीच्या रक्षणासाठी आणि हिंदीच्या सक्तीविरोधात 6 जुलै रोजी मुंबईत भव्य मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. मात्र, त्याच दिवशी संध्याकाळी त्यांनी एका निवेदनाद्वारे मोर्चाची तारीख बदलून 5 जुलै असल्याचे जाहीर केले. त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे:

“सस्नेह जय महाराष्ट्र!
आज सकाळी आपल्या मराठीनिष्ठेसाठी, महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसाच्या स्वाभिमानासाठी 6 जुलै रोजी मोर्च्याची घोषणा केली होती. त्यात आता बदल आहे. हा मोर्चा रविवार, 6 जुलैऐवजी शनिवार, 5 जुलै 2025 रोजी सकाळी 10 वाजता होणार आहे. ठिकाण आणि इतर तपशील पूर्ववत राहतील. माध्यमांनी आणि महाराष्ट्रातील जनतेने या बदलाची नोंद घ्यावी.
आपला नम्र, राज ठाकरे.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button