
कुवारबावमध्ये होणार उड्डाणपूल, माजी खासदार विनायक राऊत यांना अधिकार्यांनी दिले आश्वासन.
रत्नागिरी-मिर्या ते नागपूर या महामार्गाच्या सुरू असलेल्या कामाला सुरू असलेल्या पावसाने चांगलाच दणका दिला आहे. या कामातील अनेक नवे कंगोरे समोर आले आहेत. त्यामध्ये कुवारबाव येथून जाणार्या या महामार्गावर भविष्यात उड्डाणपूल होणार असल्याच्या दृष्टीकोनातून काम केले जात आहे. चर्मालय नाका येथे थेट क्रॉसिंग, साळवीस्टॉप येथे जंक्शन अशा कामांचाही समावेश आहे. कामाच्या अंदाजपत्रकात ६५ कोटींची वाढ झालेली असल्याने ठिकठिकाणी अनेक बदलही करण्यावर भर देण्यात येत आहे. माजी खासदार विनायक राऊत यांनी संबंधित कंत्राटदार कंपनी व्यवस्थापनाशी चर्चा केली.मिर्या-नागपूर या ९३० कोटींच्या महामार्ग प्रकल्पाचे काम सध्या रेंगाळल्याचे चित्र आहे.
यासंदर्भात राऊत यांनी या महामार्गाचे काम करणार्या ठेकेदार कंपनीचे प्रतिनिधी कुलदीप दीक्षित यांच्यासोबत चर्चा करत सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला. त्यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी या महामार्गाबाबतच्या कामाच्या असलेल्या तक्रारी उपस्थित केल्या.रत्नागिरीतून जाणार्या या महामार्गाचे ४ कि.मी.चे काम प्रलंबित राहिलेले आहे. शहरानजिकच्या अनेक भागातील या महामार्गाच्या कामाबाबत नागरिकांच्या मनात अनेक शंका निर्माण झालेल्या आहेत. त्याबाबतचेही स्पष्टीकरण कंपनीकडून देण्यात आले.www.konkantoday.com