
जिल्ह्यात औद्योगिकरण व मुंबई विद्यापीठ उपकेंद्र सक्षम करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार ः अॅड. दिपक पटवर्धन
रत्नागिरी ः माझे पद शासकीय नसले तरी माझ्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी संपर्कात राहून जिल्हयातील औद्योगिकरण व मुंबई विद्यापीठ उपकेंद्र खर्या अर्थाने सक्षम करण्यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे, असे उद् गार भाजपचे नुतन जिल्हाध्यक्ष अॅड. दिपक पटवर्धन यांनी काढले.
अॅड. दिपक पटवर्धन यांची भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा मित्रमंडळी व हितचिंतकांच्यावतीने सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या महिन्याच्या अखेरीस रत्नागिरीत येत असून त्यांचेसमोर जिल्ह्याच्या विकासासंबंधी मागण्या मांडण्यात येतील.
भारतीय जनता पक्षाला गतवैभव प्राप्त करण्यासाठी व सत्ता मिळविण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते काम करतील. कार्यकर्ता हा जनतेत मिसळणारा प्रामाणिक व पारदर्शी असावा असेही त्यांनी सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे काम जनतेपर्यंत पोहोचवूया असेही पटवर्धन यांनी सांगितले.
स्वयंवर मंगल कार्यालयात पार पडलेल्या या सत्कार समारंभाला व्यासपीठावर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ चित्रकार सुहास बहुलकर, कोकण कृषि विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. श्रीरंग कद्रेकर, डॉ. रमेश चव्हाण, सुधाकर सावंत, ऍड. विजय साखळकर, माजी प्राचार्य सुभाष देव, संतोष प्रभू व चंद्रशेखर पटवर्धन आदीजण उपस्थित होते. यावेळी पटवर्धन यांचा शाल, श्रीफळ व मानपत्र देवून सत्कार करण्यात आला व सौ. अनुराधा पटवर्धन यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
www.konkantoday.com