
चाकरमान्यांसाठी गणेशोत्सवात अतिरिक्त रेल्वे गाड्यांसाठी प्रयत्नशील
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई, पुणे आणि राज्यातून लाखो चाकरमानी कोकणात दाखल होतात. या काळात प्रवाशांची होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता, प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी यंदाही मोठ्या प्रमाणात अतिरिक्त रेल्वे गाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या संदर्भात रेल्वे प्रशासनाकडे आवश्यक तो पाठपुरावा सुरू असल्याची माहिती खासदार राणे यांनी दिली.
रविवारी रत्नागिरी दौर्यावर आलेल्या खासदार नारायण राणे यांनी ही माहिती पत्रकारांशी बोलताना दिली. मुंबई-गोवा महामार्गाची रखडलेली कामे तातडीने पूर्ण व्हावीत यासाठी खासदार राणे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. निसर्गाच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे आणि पावसामुळे या रस्त्याच्या कामात वारंवार अडथळे निर्माण होत आहेत. मात्र, कोकणवासीयांना वाहतूक कोंडीतून मुक्ती मिळवून देण्यासाठी हा महामार्ग लवकरात लवकर पूर्ण क्षमतेने सुरू व्हावा, यासाठी सातत्याने प्रयत्न सरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.




