देशभरात उद्या जनतेचा ‘युद्धसराव’, संभाव्य हल्ल्यापासून बचावासाठी केंद्राचे राज्यांना निर्देश!

नवी दिल्ली :* भारत-पाकिस्तानमध्ये ताणल्या गेलेल्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयाने काही राज्यांना स्वसंरक्षणासाठी सराव करण्याचे निर्देश सोमवारी दिले. ७ मे रोजी हा सराव होणार असून त्यामध्ये शत्रूने हल्ला केल्यास सुरक्षा यंत्रणा तसेच नागरिकांची संरक्षणसिद्धता वाढविण्याचा उद्देश असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पहलगाम हल्लेखोर तसेच त्यांच्या पाठीराख्यांना जगाच्या अंतापर्यंत शोधून शासन करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. सिंधू जलवाटप कराराला स्थगिती दिल्यानंतर आता पाकिस्तानचे पाणी अडविण्यास सुरुवात झाली असताना तेथील नेते थेट अण्वस्त्रांची धमकी देत आहेत.

या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयाने बुधवारी काही राज्यांना ‘मॉक ड्रिल’ (स्वसंरक्षण सराव) करण्याचे निर्देश दिले.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी हा सराव होणार आहे. यामध्ये हवाई हल्ला झाल्यास इशारा देणाऱ्या भोंग्यांची चाचणी तसेच अशा स्थितीत नागरिकांनी स्वत:चा बचाव कसा करावा, याबाबत प्रशिक्षण दिले जाण्याची शक्यता आहे. याशिवाय ‘क्रॅश ब्लॅकआउट’ (मोठ्या प्रदेशात एकाच वेळी अंधार करणे), महत्त्वाच्या आस्थापनांच्या संरक्षणासाठी ‘कॅमोफ्लॉज’, तातडीने स्थलांतर करावे लागल्यास त्याची तयारी आणि सराव आदीचा समावेश केला जाईल, अशी माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button