सीएसएमटी, दादरवरून थेट चिपळूण. विशेष रेल्वेगाडीसाठी कोकण विकास समितीची मागणी!


उन्हाळ्याच्या सुट्ट्यामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या प्रचंड वाढली आहे. नियमित रेल्वेगाड्यांबरोबरच विशेष रेल्वेगाड्यामध्ये प्रवाशांची गर्दी वाढत आहे. त्यामुळे मुंबईवरून कोकणात जाण्यासाठी प्रवाशांना आणखी एका विशेष रेल्वेगाडीची आवश्यकता आहे. सीएसएमटी, दादरवरून थेट चिपळूणला जाणारी विशेष रेल्वेगाडी सोडावी, अशी मागणी कोकण विकास समितीने मध्य आणि कोकण रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.

सण-उत्सव आणि सुट्ट्यांच्या काळात रेल्वे प्रशासन गोवा आणि सिंधुदुर्ग भागासाठी विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात येतात. त्यामुळे रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, महाड, माणगाव, रोहा, पेण व अन्य स्थानकांवरून प्रवाशांना रेल्वेगाड्यांमध्ये जागा मिळणे कठीण होते. या रेल्वेगाड्या प्रवाशांनी भरलेल्या असतात. आरक्षण असूनही प्रवाशांना रेल्वेगाडीत प्रवेश करता येत नाही. परिणामी, प्रवाशांचा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.

रेल्वे प्रशासनाने पनवेलवरून चिपळूण विशेष रेल्वेगाडी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी, मुंबई शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरांतील, तसेच ठाणे जिल्ह्यातील प्रवाशांना या गाडीने प्रवास करणे गैरसोयी होते. मुंबईतील लालबाग, गिरगाव, परळ, माहीम, वरळी, अंधेरी, सांताक्रूझ, बोरिवली, घाटकोपर, भांडूप, ठाणे, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, विरार, वसई, नालासोपारा येथील प्रवाशांना पनवेल स्थानक अजिबात सोयीचे नाही.

तसेच लहान मुले, वृद्धांना आणि सामान सोबत घेऊन दोन ते तीन लोकल बदलून प्रवास करणे प्रवाशांसाठी तारेवरची कसरत ठरते. त्यामुळे खेड/चिपळूणला जाणाऱ्या रेल्वेगाडीला दादर आणि ठाणे हे थांबे आवश्यक आहेत. पनवेल चिपळूण रेल्वेगाडीला एकही आरक्षित डबा नसल्यामुळे प्रवाशांना गाडीत जागा मिळण्याबाबत अनिश्चितता असते. त्यामुळे सीएसएमटी, दादरवरून थेट चिपळूण विशेष रेल्वेगाडी चालवण्याची मागणी मध्य आणि कोकण रेल्वे प्रशासनाकडे करण्यात आल्याचे कोकण विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष जयवंत दरेकर यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button