
बँकांमध्ये मराठी मुद्द्यासाठीचं आंदोलन थांबवा,- राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश
नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्या निमित्त आयोजित मनसेच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांना राज्यातील बँकांमध्ये मराठीचा वापर होतोय की नाही यासाठी आंदोलन करण्यास सांगितले होते.आता राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना हे आंदोलन थांबवण्यास सांगितलंय. यासंदर्भात राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पत्र लिहून मनसे सैनिकांना आवाहन केलंय. राज ठाकरेंनी मराठीच्या मुद्द्यासाठी पुन्हा आवाज उठवल्याबद्दल कार्यकर्त्यांचं अभिनंदनही केलंय.राज ठाकरे म्हणाले की, सर्वप्रथम महाराष्ट्रत मराठीच्या मुद्द्यासाठी तुम्ही पुन्हा एकदा जी एक जोरदार आवाज उठवलात त्यासाठी तुमचं मनापासून अभिनंदन. मी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात तुम्हाला आदेश दिला होता की महाराष्ट्रातील बँकांमध्ये मराठीत व्यवहार होत आहेत की नाही हे पाहा आणि नसल्यास त्याबद्दलची जाणीव त्या बँकेच्या प्रशासनाला करून द्या.
गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशीपासून तुम्ही महाराष्ट्रात सर्वदूर बँकांमध्ये गेलात, तिथे मराठीचा आग्रह धरलात, हे उत्तम झालं. यातून मराठी भाषा आणि मराठी माणूस यांना कोणी गृहीत धरू शकत नाही हा संदेश जसा गेला, तसंच सर्वदूर असलेली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची संघटनात्मक ताकद पण दिसली असंही राज ठाकरेंनी पत्रात म्हटलंय.मराठीच्या मुद्द्यासाठी सुरू केलेलं आंदोलन आता आंदोलन थांबवायला हरकत नाही, कारण आपण या विषयांत पुरेशी जागृती केली आहे. हे घडलं नाही तर काय होऊ शकतं याची चुणूक दाखवली आहे. आता मराठी जनतेनेच आग्रह धरायला हवा आणि आपल्या मराठी समाजानेच जर कच खाल्ला, तर मग ही आंदोलने तरी कशासाठी करायची ? आणि सगळ्यात महत्वाची जबाबदारी सरकारची आहे. रिझर्व्ह बँकेचा नियम त्यांना माहीत आहे आणि त्या नियमाची अंमलबजावणी करून घेणं ही आता सरकारची जबाबदारी आहे असं राज ठाकरे म्हणाले.
माध्यामांशी बोलताना राज्याचे मुख्ममंत्री म्हणाले होते की आम्ही कोणाला कायदा हातात घेऊ देणार नाही. यावरही राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, कायदा हातात घेण्याची इच्छा आम्हालाही नाही, पण तुम्ही कायद्याचे रक्षक आहात, तर मग रिझर्व्ह बँकेच्या नियमाची अंमलबजावणी करणं पण तुमचंच काम नाही का? असा प्रश्नही राज ठाकरेंनी उपस्थित केला.तुम्ही बँकांना आणि इतर आस्थापनांना मराठीचा सन्मान करायला लावा, मग आम्ही कायदा हातात घेणार नाही हे नक्की. त्यामुळे महाराष्ट्र सैनिकांनी, तूर्तास आंदोलन थांबवा पण या मुद्यावरचं लक्ष हटू देऊ नका. सरकारलाही माझे सांगणे आहे की परत कुठे नियम पाळला जात नसेल, आणि मराठी माणसाला गृहीत धरलं जात असेल, किंवा अपमान केला जात असेल तर पुन्हा तिथे माझे महाराष्ट्र सैनिक त्यांच्याशी चर्चा करायला अवश्य येतील असा स्पष्ट इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे. आजच उद्योग मंत्री व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी राज ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली होती त्यानंतर राज ठाकरे यांनी आता हा निर्णय जाहीर केला आहे