
गोशाळेसाठी कोकरे महाराजांचे उपोषण सुरूआर या पारची लढाई, मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार नाही.
चिपळूण : लोटे परशुराम येथील श्री. संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्तीधाम सेवा संस्थानच्या गोशाळा संदर्भातील विविध मागण्यासाठी भगवान कोकरे महाराजांनी सोमवार पासून बेमुदत उपोषणाला सुरवात केली. या उपोषणाला महाराष्ट्र राज्य वारकरी सांप्रदायीक संघटनेने पाठींबा जाहीर केला. मागण्यांच्या पुततेसाठी दोन वर्षात कोकरे महाराजांनी पाचव्यांदा उपोषणाचे हत्यार उपसले आहे.लोटे परशुराम येथील गोशाळे संदर्भात तसेच विविध मागण्यासाठी गोशाळेतच सोमवार १७ फेब्रुवारी पासून आमरण उपोषणाला सुरवात केली.
उपोषणाच्या पार्श्वभूमीवर कोकरे महाराज म्हणाले, कत्तलखान्याकडे जाणाऱ्या गायी रोखण्यासाठी तसेच मोकाट गुरांचा सांभाळ होण्यासाठी लोटे येथे गोशाळेची उभारणी केली. येथे ११०० हून अधिक गायी आणि वासरांची देखभाल केली जाते. राज्यात गाईला राज्यमातेचा दर्जा असताना लाखो गाईंच वाहतूक करून कत्तल केली जाते. त्यावर ठोस उपाययोजना झालेल्या नाहीत. राज्यात प्रतिगोवंश ५० रूपये अनुदान गोशाळांना मिळायला हवे. गोशाळेतील ११०० गायींचा प्रश्न २ वर्षापुर्वी केलेल्या उपोषणात सोडवण्याचे आश्वासन मिळाले.मात्र अद्याप त्यावर निर्णय नाही. गोशाळेचे मंजूर २५ लाखाचे अनुदान तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देण्याची शिफारस केली असतानाही ते अदा झाले नाही.
गोशाळेला व्यावसायीक दरानेच विजपुरवठा होत असून तो शेतीप्रमाणे आकारण्यात यावा. परिपोषण योजनेत देशी गायीला स्थान मिळाले, परतू बैलाला स्थान नसल्याने त्याची वाहतूक करून कत्तल केली जाते. गाशाळेतून कोणत्याही प्रकारचे उत्पन्न नाही. ११०० गायींसाठी दररोज ८० हजाराचा खर्च आहे. खर्चाचा ताळमेळ जुळत नसल्याने गाशाळेवर ५० लाखाच्या कर्जाचा डोंगर आहे. यातून गायी वाचणार कशा, गायींसाठी कोकणच्या धर्तीवर चारा उपलब्ध होत नाही. रोज सुमारे ७ टन ओला व सुका चारा द्यावा लागतो. किर्तनसेवेच्या मिळणाऱ्या सेवा शुल्कातून हा खर्च भागत नाही.राज्य सरकारने गायीला राज्यमातेच दर्जा दिला. सरकारी अनुदान मिळतेय म्हणून दातेही पुढाकार घेत नाही.
मात्र प्रत्यक्षात अनुदानाचा पत्ता नाही. या सर्व बाबी आमच्या आर्थिक ताकदीच्या पलिकडच्या आहेत. याकामी पुढाकार शासनाने घ्यायला हवा. अन्यथा मला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही.भगवान कोकरे महाराजांच्या या उपोषणाला सर्वच स्तरातून पाठींबा मिळत आहे. यापुर्वी २०२३ मध्ये ४ वेळा उपोषण केले होते. त्या-त्यावेळी आश्वासने मिळाली. मात्र आता मागण्यांची पुर्तता झाल्याशिवाय माघार नाही. ही आर या पार ची लढाई असल्याचे महाराजांनी नमुद केले.