
हिरकन्या’ बोट अलिबागच्या समुद्रात बुडाली; १५ खलाशी बचावले!
अलिबाग येथील समुद्रात तालुक्यातील आक्षी साखर येथील हिरकन्या ही मच्छीमारी बोट सोसाट्याच्या वाऱ्यामुळे सोमवारी रात्री बुडाली. दुसऱ्या मच्छीमारी बाेटीतील खलाशांनी वेळीच प्रसंगावधान राखून मदत केल्याने १५ खलाशांचा जीव वाचला.बोटमालकाचे मात्र २० लाखांहून अधिक रुपयांचे नुकसान झाले. ‘हिरकन्या’मधील खलाशी हे मासेमारी करताना थकून बोटीतच झोपले होते.
त्याचवेळी जोरदार वाऱ्यामुळे बोट भरकटली. त्यानंतर काही काळाने बोटीत पाणी भरल्याने ती बुडू लागली. ही घटना समोरून येणाऱ्या बोट चालकाच्या लक्षात येताच, त्याने आरडाओरडा करून हिरकन्यामधील खलाशांना जागे केले. त्यानंतर त्यांना बोटीत घेतले. मात्र, हिरकन्या बुडाली. सुमारे १७ तासांच्या अथक परिश्रमानंतर बोट बाहेर काढण्यात मच्छीमारांना यश आले.