
चिपळुणातील गाळ उपशावर १० कोटींचा खर्च, उपयोग मात्र शून्य -लियाकत शहा
चिपळूण शहरातील वाशिष्ठी नदीतील गाळ उपशावर सुमारे १० कोटी अधिकचा निधी खर्च केला. मात्र उपसलेला गाळ भरावासाठी आणि शहरातील तळी बुजविण्यासाठी केला गेला. इमारती, बंगले उभारण्यासाठी जागोजागी केलेल्या भरावामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाला आहे. केवळ साडेतीन तास पडलेल्या पावसानंतर शहरात रविवारी पूरसदृश स्थिती निर्माण झाली. ही बाब अत्यंत गंभीर आहे. या परिस्थितीला जबाबदार असलेल्या बांधकामधारकांना प्रशासनाने वेळीच आवर घातला नाही किंवा चुकीच्या दिलेल्या बांधकाम परवानग्या रद्द न केल्यास चिपळूण कॉंग्रेसतर्फे तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा कॉंग्रेस तालुकाध्यक्ष लियाकत शाह यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिला.गेले दोन दिवस येथे मुसळधार पाऊस सुरू असून रविवारी सायंकाळी शहरात पूरसदृश स्थिती निर्माण झाली होती. अवघ्या काही तासाच्या पावसाने ही परिस्थिती निर्माण झाल्याने लियाकत शाह यांनी शहरात जागोजागी केलेल्या भरावाला आक्षेप घेतला आहे. त्याबाबत प्रांताधिकारी आकाश लिंगाडे, तहसिलदार प्रविण लोकरे, मुख्याधिकारी विशाल भोसले यांना सोमवारी निवेदन दिले आहे.www.konkantoday.com