
खेड परिसरात पाणी टंचाई वाढली, ३९२० ग्रामस्थांची पाण्यासाठी धावाधाव
खेड तालुक्यात पाणीटंचाईच रौद्ररूप धारण केल्याने आतापासूनच ग्रामस्थांसह प्रशासन रडकुंडीस आले आहे. तालुक्यात ३२ गावे ३५ वाड्यांना पाणीटंचाईची झळ पोहचत असून तब्बल ३९२० ग्रामस्थांचा पाण्यासाठी आक्रोश सुरू आहे. सर्वाधिक पाणीटंचाईचे चटके फुरूस-गावठण वाडीतील ग्रामस्थांना बसत आहे. तर सर्वाधिक कमी पाणीटंचाइंची झळ तळे-धनगरवाडी व घेरारसाळगडातील ओझरवाडी येथील ग्रामस्थांना बसत आहे. या दोन्ही वाड्यांतील अवघ्या १० ग्रामस्थांचा पाण्यासाठी टाहो सुरू आहे.तालुक्यात ८ एप्रिलपासून पाण्याचा पहिला टँकर धावू लागला आहे. सुसेरी-देवसडे येथील ६ वाड्यांमध्ये पाण्याचा पहिला टँकर धावू लागल्यानंतर एकामागोमाग एक टँकरच्याा पाण्यासाठी प्रशासनाकडे अर्ज दाखल होवू लागले. रणगणत्या उन्हामुळे पाण्याचे उपलब्ध जलस्त्रोत आटत असल्याने दिवसागणिक टंचाईग्रस्त गाव वाड्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. www.konkantoday.com