
वरंधा घाट रस्त्याच्या कामामुळे फक्त कोकणात जाण्यासाठी 30 मे पर्यंत बंद राहणार
_महाड-भोर-पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गावरील वरंधा घाट ते महाड दरम्यानच्या रस्त्याच्या कामामुळे वरंधा घाटाच्या महाडच्या बाजूची सर्व वाहतूक ३० मे पर्यंत बंद राहणार आहे. राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि पोलिस विभागाकडून अहवाल मागविल्यानंतर रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सोमवारी (ता.८) वरंधा घाटातील महाडच्या हद्दीतील वाहतूक बंद करण्याचा आदेश दिला.यामुळे भोरमार्गे महाड व कोकणात जाता येणार नाही. मात्र वरंधा घाटातील भोरच्या हद्दीतील वाघजाई मंदीरापर्यंत म्हणजे भोरपासून सुमारे ५० किलोमीटरच्या टापूत वाहतूक सुरु राहणार आहे. त्यामुळे भोर परिसरात फिरायला येणा-या पर्यटकांना वरंधा घाट बंद असल्याचा काहीही फरक प़डणार नाही. सुट्टीच्या दिवशी पुण्या-मुंबईतील अनेक पर्यटक हे एक किंवा दोन दिवसाच्या आऊटींगसाठी भोर परिसरात येतात. तालुक्यातील पर्यटनस्थळे पाहून हॉटेलमध्ये किवा कृषी पर्यटन केंद्रात वन नाईट स्टे करून पुन्हा परत जातात.पर्यटकांना भोर तालुक्यातील श्रीक्षेत्र बनेश्वर, बालाजी मंदीर, नीरा नदीचा नेकलेस पॉईंट, भाटघर धरण, भोरचा राजवाडा, शनिघाट, स्वामीमसर्थ मंदीर, मांढरदेवी, नीरा-देवघर धरण, आंबवडेचे नागनाथाचे मंदीर व झुलता पूल, वरंधा घाटातील वाघजाई मंदीर, शिरगाव व उंबर्डे येथील पाण्याचे धबधबे, सह्याद्रीच्या डोंगररांगांचे व द-याखो-यांचे विहंगम दृश्य, रायरेश्वर व रोहिडेश्वर किल्ले या पर्यटनस्थळांवर आजही जाता येणार आहे. पर्यटनाबरोबर काळी मैना (करवंदे), जांभूळ, आळू, आंबे व हिरडा यासारखा रानमेवा ही सुरु होणार आहे. त्यामुळे पर्यटकांना नेहमीप्रमाणे पर्यटनाचा आनंद घेवून पुन्हा भोरमार्गेच परत घराकडे जावे लागणार आहे.www.konkantoday.com