
खेड तालुक्यातील प्रसिद्ध रघुवीर घाटाचा रस्ता खड्डेमय
खेड तालुक्यातील प्रसिद्ध मान्सून पर्यटनस्थळ म्हणून ओळखल्या जाणार्या रघुवीर घाटाकडे जाणारा रस्ता पावसाळ्यापूर्वीच धोकादायक बनला असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पर्यटक आणि वाहनचालकांची मोठी गैरसोय होत आहे. रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली असून ठिकठिकाणी मोठे खड्डे पडल्याने तसेच रस्त्यावर दगड आणि खडी पसरल्याने वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे.
दरवर्षी जून महिन्यापासून रघुवीर घाट परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. मात्र यंदा पावसाने उशिरा हजेरी लावल्याने परिसरात तुलनेने शांतता दिसून येत आहे. असे असतानाही पर्यटन हंगाम सुरू होण्यापूर्वी रस्त्याची आवश्यक दुरुस्ती करण्यात आलेली नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, रघुवीर घाटाकडे जाणारा मार्ग केवळ पर्यटनासाठीच महत्त्वाचा नसून अनेक गावांच्या दळणवळणाचा प्रमुख मार्ग आहे. तसेच रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यांना जोडणारा हा महत्त्वाचा राज्य मार्ग असल्याने या रस्त्यावरून दररोज मोठ्याप्रमाणात वाहनांची ये-जा होत असते. मात्र सध्या रस्त्यावरील खड्डे आणि उखडलेल्या भागांमुळे अपघाताचा धोका वाढला आहे.
www.konkantoday.com




