
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या कऱ्हाड-चिपळूण महामार्गाचे भीषण वास्तव समोर
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या कऱ्हाड-चिपळूण या नव्याने तयार झालेल्या महामार्गाचे एक भीषण वास्तव समोर आले आहे.मागील चार वर्षांपासून कऱ्हाड-चिपळूण महामार्ग या रस्त्याचे काम संथ गतीने सुरू होते. मात्र, रस्ता पूर्ण होऊन काही महिने होतात ना तोच रस्त्याला तडा पडल्याचे समोर आल्याने प्रशासनाचा गलथान कारभार समोर आला आहे. अनेक ठिकाणी रस्त्यामध्ये भेगा पडल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित होत आहे. या भेगांवरून गाडी चालविताना घसरण्याचे प्रकार घडत आहेत. शिवाय अपघात वाढण्याची शक्यता वाढली आहे.पाटण शहरातून जाणाऱ्या बहुचर्चित कऱ्हाड-चिपळूण महामार्ग सुरुवातीपासून वादात राहिला आहे. या रस्त्याच्या कामाला सुमारे चार वर्षे झाली. तरीही अद्याप रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही. पाटण ते कोयनानगर, हेळवाक दरम्यानच्या कामाचे घोंगडे भिजत आहे. या महामार्गासाठी केंद्रीय रस्ते विकास विभागाकडून मंजूर झालेल्या तब्बल २८७ कोटी रुपयांच्या निधीचे काम अपूर्ण अवस्थेत आहे. एकीकडे रस्त्याचे पूर्ण झाले नाही, तर दुसरीकडे जे काम झाले आहे. त्याच्या गुणवत्तेबाबत नेहमीच प्रश्न उपस्थित केला गेला आहे. त्यासाठी ठेकेदार कंपनीच्याविरोधात पाटण तालुक्यातील नागरिकांना आवाज उठवला होता, तसेच आंदोलन करून काम बंद पाडले होते. मात्र, प्रशासनाकडून संबंधित कंपनीच्या विरोधात अद्याप कारवाई करण्यात आली नाही.वाढत्या वाहनसंख्येमुळे सध्या वाहतूक धोकादायक झाली असतानाच सिमेंटच्या रस्त्यावरील भेगांमुळे त्यात आणखी भर पडली आहे. त्यामुळे दुचाकी चालकांचे अपघात होत आहे. रस्त्यांवर पडलेल्या भेगा दुचाकीस्वारांसाठी अडचणीच्या ठरत आहेत. या भेगांवरून गाडी चालविताना घसरण्याचे प्रकार घडत आहेत. या रस्त्यावरही भेगांचे अस्तित्व मोठ्या प्रमाणावर दिसून येते. उभ्या भेगांबरोबरच या रस्त्यावर आडव्या भेगाही आहेत, तसेच एक-दोन ठिकाणी सिमेंट उखडल्याने खड्डेही पडले आहेत. तेथेही वाहनचालकांना याच परिस्थितीचा सामना करावा लागतो. महामार्गावर अनेक ठिकाणी सिमेंट रस्त्यांवर थोड्याबहुत प्रमाणात हे चित्र दिसून येते. रस्त्यांवर मध्यभागी आणि जोड भागात (जॉइंट्सला) भेगा पडल्या आहेत. त्या भेगांवरून गाडी जाताना ती घसरण्याची शक्यता असते. काही ठिकाणी गाडी घसरून अपघात होत आहेत.www.konkantoday.com