
*काँग्रेस निरीक्षक बैठकीवर एका गटाचा बहिष्कार**लोकसभा निवडणूक ; काँग्रेसकडून जिल्ह्याचा आढावा*
___रत्नागिरी जिल्ह्यात काँग्रेस मधील गटाचे राजकारण अद्यापही सुरू आहे महाविकास आघाडी म्हणून लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना प्रत्येक घटक पक्ष रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आढावा घेताना दिसत आहे.त्या अनुषंगाने कोकण निरीक्षक म्हणून नियुक्ती केलेल्या भाई जगताप यांचा नुकताच रत्नागिरी दौरा झाला; परंतु या दौऱ्यामध्ये आजी-माजींमधील गटतट पुढे आले. अनेक माजी पदाधिकाऱ्यांनी बैठकीवर बहिष्कार टाकल्याचे दिसून आले. निरीक्षक भाई जगताप यांनी रत्नागिरी दौरा करून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मरगळ झटकण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांच्या आढावा बैठकीला अपेक्षित उपस्थिती दिसली नाही. यावरून निरीक्षकांसमोरच गटतट उघडकीस आले. विद्यामान जिल्हाध्यक्ष अविनाश लाड आणि त्यांच्या गटाची उपस्थिती होती; परंतु यामध्ये माजी जिल्हाध्यक्ष कीर आणि त्यांच्या समर्थक माजी सरचिटणीस बाळा मयेकर, माजी शहराध्यक्ष राकेश चव्हाण, तालुकाध्यक्ष विकास पाटील आदींची गैरहजेरी प्रकर्षाने दिसत होती. त्यांच्या गटातील अनेक माजी नेते आणि खंदे समर्थकांनी या बैठकीकडे पाठ केल्याचे दिसत होते. पक्षातील या कुरघोड्याबाबत मात्र निरीक्षक जगताप यांनी कोणतेही थेट भाष्य केले नाही. आमच्या पक्षाला दीडशे वर्षांपूर्वीची परंपरा आहे. त्यामुळे अशा काही गोष्टी घडायच्या; परंतु आम्ही त्याकडे लक्ष देऊन तोडगा काढू, असे सावध विधान केले.www.konkantoday.com