
मंत्री, लोकप्रतिनिधी, अधिकारी अन ठेकेदारांवर गुन्हा दाखल करा
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बहाद्दूरशेखनाका येथे नव्याने उभारण्यात येत असलेला उड्डाणपूल सोमवारी दुपारी कोसळला. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर ऍड. ओवेस पेचकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असतानाच आता येथील सामाजिक कार्यकर्ते तानू आंबेकर यांनी याबाबत थेट पोलिसांत तक्रार दाखल करत मंत्री, लोकप्रतिनिधी, अधिकारी व ठेकेदारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
सामाजिक कार्यकर्ते आंबेकर यांनी मंगळवारी रात्री येथील पोलीस निरीक्षक रविंद्र शिंदे यांच्याकडे ऑनलाईन दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, उड्डाणपूल कोसळून मोठी वित्तहानी झाली. या घटनेची गंभीरपणे दखल घेवून सार्वजनिक बांधकाम विभागाचे २७ एप्रिल २०१७ चे शासन परिपत्रकानुसार कारवाई करावी. काम खराब झाल्यास किंवा पूल पडल्यास त्याची सर्व जबाबदारी कंत्राटदार, संबंधित अधिकारी यांची राहिल. या संबंधीची विशेष अट निवेदनात नमूद करून ही कारवाई दिवाणी व गुन्हेगारी स्वरूपाची राहिल, याची नोंद संबंधितांनी घेतल्याचे प्रमाणपत्र जोडून कंत्राटदारांची सही घ्यावी, असे नमूद आहे. या घटनेत काही नागरिक जखमी झाले आहेत. तेव्हा या घटनेला जबाबदार असलेल्या संबंधित ठेकेदार, संबंधित मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ व कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग रत्नागिरी आणि ब्रिज डिझाईन इंजिनियर व यावरील सर्वोच्च लोकप्रतिनिधी व सार्वजनिक बांधकाम मंत्री जबाबदार आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल होणे आवश्यक आहे.
www.konkantoday.com