
बदलत्या वातावरणामुळे यंदा 32 हजार 398 शेतकर्यांनी घेतला आंबा, काजूसाठी विमा
रत्नागिरी : विमा उतरविणार्या बागायदारांच्या संख्येत यंदा वाढ झाली आहे. यंदा 32 हजार 398 आंबा व काजू शेतकर्यांनी विमा स्वीकारला आहे. त्यात 26 हजार 518 आंबा बागायतदार आहेत. सर्वाधिक प्रतिसाद रत्नागिरी, संगमेश्वर तालुक्यातील शेतकर्यांचा
मिळाला. रत्नागिरी जिल्ह्यात एकूण 65 महसुली मंडले असून, त्यात पंधराशेहून अधिक गावे आहेत. गतवर्षी 26 हजार 611 बागायतदारांच्या 14732.89 हेक्टर क्षेत्रावरील विमा उतरविला होता. त्यात 22 हजार 380 आंबा बागायतदार तर 4 हजार 231 काजू बागायतदार होते.
वातावरणात होणारे सातत्याने बदल, पावसाची अनिश्तितता त्यामुळे बागायतीवर होणारा परिणाम लक्षात घेऊन विमा सुरक्षा घेण्याकडे कल वाढू लागला आहे. गतवर्षी विक्रमी 94 कोटी 41 लाख विमा परतावा शेतकर्यांना मिळाला होता. गतवर्षीच्या तुलनेत सव्वासहा हजार बागायतदारांनी विमा योजनेला प्रतिसाद दिला आहे. यंदा विमा उतरवणार्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. यंदा एकूण 32 हजार 389 शेतकर्यांनी विमा उतरवलेला आहे. त्यातील 26 हजार 518 आंबा तर 5 हजार 880 काजू बागायतदार आहेत. विमा घेणारे 28 हजार 251 कर्जदार असून, 4 हजार 147 बिगर कर्जदार शेतकरी आहेत. विमा हप्त्यापोटी शेतकर्यांनी 20 कोटी 85 लाख रुपये भरले
आहेत.