
राजापुरातील गाळ टाकणार चिरेखाणींमध्ये; बागायतदारांनाही गाळाबाबत आवाहन
राजापूर : शहरातील अर्जुना आणि कोदवली नदीपात्रातील गाळ उपशासाठी नाम फाऊंडेशनने पुढाकार घेतला आहे. नगर परिषद, महसूल प्रशासनाच्या सहभागातून आणि लोकसहभागातून या दोन्ही नद्यांतील गाळ उपसा केला जाणार आहे. प्रारंभी कोदवली नदीपात्रातील गाळ उपशाचे काम हाती घेण्यात आले असून या कामाने आता वेग घेतला आहे. कोदवली नदीपात्रात तसेच कोदवली धरण परिसरात उपसल्या जात असलेला गाळ शुक्रवार 6 जानेवारीपासून नदीपात्रातून बाहेर काढला जाणार आहे. सदरचा गाळ हा शहर व परिसरात असलेल्या रिकाम्या चिरेखाणींमध्ये टाकला जाणार आहे. तर ज्या बागायतदारांना हा गाळ बागेत भरावासाठी व मशागतीसाठी न्यावयाचा आहे, त्यांनी तो न्यावयाचा आहे असे आवाहन महसूल प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
नदीपात्रात उपसण्यात आलेला गाळ नदीपात्राच्या बाहेर काढून त्याची वाहतूक केली जाणार आहे. याच्या नियोजनासाठी मंगळवारी प्रांताधिकारी वैशाली माने यांच्या उपस्थितीत नगर परिषदेच्या बॅ. नाथ पै सभागृहात बैठक पार पडली. या बैठकीत गाळ वाहतुकीबाबत नियोजन करण्यात आले.
या बैठकीला तहसीलदार शीतल जाधव, मुख्याधिकारी प्रशांत भोसले, पोलिस निरीक्षक जनार्दन परबकर, मुख्य लिपिक जितेंद्र जाधव, ठेकेदार संघटना अध्यक्ष अशफाक हाजू, व्यापारी संघटना अध्यक्ष संदीप मालपेकर, उपाध्यक्ष राजन नवाळे, राजापूर पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र मोहिते, डॉक्टर असोसिएशनचे डॉ. उत्तम प्रभुदेसाई, व्यापारी प्रशांत पवार, बाळा पोकळे, सौरभ खडपे, अरविंद लांजेकर आदींसह अधिकारी उपस्थित होते. शहरातील अर्जुना आणि कोदवली नदीपात्रातील गाळ उपशासाठी नाम फाऊंडेशनने पुढाकार घेतला आहे. नगर परिषद, महसूल प्रशासनाच्या सहभागातून आणि लोकसहभागातून या दोन्ही नद्यांतील गाळ उपसा केला जाणार आहे. दरम्यान राज्याचे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी कोदवली नदीतील गाळ उपशासाठी जिल्हा नियोजनमधून 25 लाखांचा निधी मंजूर केला असून सदरचे काम हे जलसंपदा विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.